जयेश राणे
कठीण परिस्थिती माणसाला अनेक गोष्टी शिकवत असते. त्यातून माणूस घडत असतो. अर्थातच जो यातून शिकतो तोच अशा स्थितीतही कसे राहायचे हे शिकतो आणि तेच महत्त्वाचे आहे. अन्यथा कठीण प्रसंग ओढवला म्हणून खचले जाते.
कठीण प्रसंगास तोंड देण्याची प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. सर्वांनाच ते शक्य होत नाही. आर्थिक काटकसर कशी करायची? हा मूलमंत्र वर्तमान परिस्थिती अनेकांना शिकवत आहे. या प्रसंगातून जाताना कित्येकांची तारेवरची कसरत सुरू आहे. “सर्व काही करता येते मात्र पैशाचे सोंग करता येत नाही’, असे म्हणतात, हे 100 टक्के खरे आहे. आपल्याकडील काही सुरक्षित ठेवी जमा आहेत. त्यावर काहीजण उदरनिर्वाह करत आहेत. कारण आहे, काम बंद असणे. अर्थचक्र पूर्ववत कधी होणार? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. काम मोठे असो अथवा छोटे, काम हे काम असते. कारण त्याचे दाम म्हणजे “वेतन’ मिळत असते आणि त्यावर आपला उदरनिर्वाह अवलंबून असतो.
अर्थचक्रच रुतल्याने पुष्कळ आर्थिकहानी झाली आहे. ती भरून निघण्यासाठी नक्कीच काही कालावधी लागणार आहे. मात्र, ती भरपाई होण्यास केव्हापासून आरंभ होणार याविषयी अनिश्चितता आहे. विविध क्षेत्रातील नोकरी, व्यवसाय यांना खीळ बसल्याने अगदी लहानसहान गोष्ट ही कठीण झाली. साधारणपणे रविवारी सुट्टीच्या दिवशी केस कापले जातात. मात्र, या काही महिन्यांत तेही कठीण झाले. या माध्यमातून परिस्थितीचा कानोसा घेऊया.
दाढी, केस, नखे यांची अनुरूप कटिंग करत प्रत्येकजण स्वतःची ठेवण ठेवत असतो. मात्र, वर्तमान स्थितीने याविषयीची गणिते बिघडवली आहेत. साधारण एक किंवा दीड महिन्याने केस कर्तन केले जाते. त्यासाठी रविवारची सुट्टी ही हक्काची सुट्टी असल्याने त्यादिवशी केशकर्तनालयात केस कापण्यास दिवसभर रांग असते. असे प्रत्येक रविवारचे चित्र असते. केस कापणे हा भाग पूर्णपणे परावलंबी असल्याने त्यासाठी केशकर्तनालयाचा आधार घेण्याविना पर्याय नसतो. वर्तमान स्थितीत केस कापण्याचे काय? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. केस कापणे म्हणजे हेअर कटिंग हा व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा भाग आहे.
काही आस्थापने हळूहळू सुरू होत आहेत, तर बहुतांश आस्थापने अजूनही बंद आहेत. तर काही आस्थापनांचे “वर्क फ्रॉम होम’ चालू आहे. त्यामुळे कार्यालयात जायचे आहे. अशी घाई नाही. असे असले तरी केस कापणे भाग आहे. वर्तमान कालावधीत अनेकजण घरीच असल्याने पूर्ण बारीक केस कापण्यास काहीच हरकत नाही. मला कोण काय म्हणेल? यापेक्षा शरीराची स्वच्छता राहणे आवश्यक आहे. त्याला प्राधान्य दिले पाहिजे. हा विचार महत्त्वाचा आहे.
काहीजणांनी बारीक केस करून घेतले आहेत. त्यामुळे पुढील दोन ते अडीच महिने तरी त्यांची चिंता मिटली आहे. कदाचित तीन महिने ही त्यावर काढले जातील. परिस्थिती तशी असल्याने त्या अनुरूप पर्यायांचा विचार करावा लागतो. वर्तमान परिस्थिती येईल, असे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. मात्र, वातावरणात झालेल्या बदलाने सर्व चित्र बदलले. दाढी करण्याच्याबाबतीत अनेकजण स्वयंपूर्ण आहेत. ज्यांना याची सवय नाही म्हणजे दाढी करता येत नाही, तेही आताच्या काळात ती नेटकेपणाने करण्यास शिकले असतील.
लॉकडाऊन हे सूत्र अनेक गोष्टी शिकवत आहे. उदा. स्वयंपाक बनवणे, घरकाम करणे, वर्क फ्रॉम होम, कुटुंबीयांची काळजी घेणे, त्यांना काय हवे नको ते पाहणे इत्यादी. सोसायट्यांनी बाहेरच्या मंडळींना प्रवेश मनाई केली आहे. परिणामी स्वयंपाकगृह, घराची स्वच्छता, कपडे-भांडी धुणे यांसह वर्क फ्रोम होम करणे हा भागही आलाच. लॉकडाऊन माणसाला स्वयंपूर्ण बनवत आहे. प्रत्येकाला स्वतःची क्षमता ओळखण्यास शिकवून त्याप्रमाणे काम करवून घेत आहे. घरकाम करताना तारेवरची कसरत होत असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी प्रथम घर जिंकणे महत्त्वाचे आहे, हे जाणणे आवश्यक आहे. ज्याने घर जिंकले त्याने जग जिंकले असे म्हणतात.
सवयी अंगवळणी पडण्यासाठी कठीण जात असले, तरी लॉकडाऊनने आपल्याला वरीलपैकी अनेक गोष्टी नव्याने शिकवल्या असतील. किंबहुना त्या शिकण्याशिवाय पर्यायच नसल्याने शिकून गरज भागण्यासाठी काम करणे हेही एक प्रकारचे कामच आहे. ज्या आस्थापनांसाठी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना यशस्वी झाली आहे, त्यांनी ती यशस्वीपणे राबवण्यासाठी विचार करावा. कारण यामध्ये नोकरी टिकून आहे. आस्थापनाचे कामही होत आहे. त्यांचे कर्मचारी वर्गाला वेतनही मिळत आहे. सूक्ष्म, लघू, मध्यम आदी उद्योगांचे प्रकार आहेत. त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हे उद्योग हळूहळू सुरू होत आहेत. त्यामुळे अनेकांना रोजंदारी थोड्याफार प्रमाणात तरी मिळत आहे.
अर्थचक्र मंदावल्याने बाजाराची स्थितीही अत्यंत नाजूक आहे. हे सर्व पुढे कसे असणार आहे? याविषयी आताच भाष्य करणे कठीण आहे. मात्र, अद्यापही राज्य, देशाच्या अर्थचक्राने वेग घेतलेला नाही. अर्थचक्राने लवकरात लवकर वेग पकडावा जेणेकरून आर्थिकस्थिती पूर्ववत होईल.