नवी दिल्ली: दूरसंचार क्षेत्रातील 4 जी आधुनिकीकरणासाठी चिनी दूरसंचार उपकरणे न वापरण्याची सूचना दूरसंचार विभागाच्यावतीने भारत संचार निगम लिमिटेड अर्थात “बीएसएनएल’ला करण्यात आली आहे. “बीएसएनएल’च्या पुनरुज्जीवनाच्या धोरणाचा भाग म्हणून ही सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पूर्व लडाखमधील पान्गोंग त्सो, गालवान खोरे, देमचोक आणि दौलत बेग ओल्डी या भागांमध्ये चीनच्या सैनिकांबरोबर भारतीय लष्कराच्या संघर्षाच्या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर ही सूचना करण्यात आली आहे. या संघर्षाच्या घटनेमुळे देशात चीनविरोधी जनभावना निर्माण व्हायला लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून व्यापारी विश्वातील “सीएआयटी’ सारख्या काही संघटनांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
दूरसंचार विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4- जी श्रेणी सुधारणेसाठी चिनी उपकरणांचा वापर न करण्याची सूचना बीएसएनएलला केली जाणार आहे. या संदर्भातील निविदाही नव्याने काढली जाणार आहे. अशाच प्रकारचा संदेश महानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात “एमटीएनएल’लाही दिला जाणार आहे.
खासगी दूरसंचार कंपन्यांकडूनही चिनी बनावटीच्या टेलिकॉम उपकरणांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पावले उचलली जावीत, यासाठीही दूरसंचार विभाग विचार करत आहे. पूर्वी चिनी उपकरणांच्या नेटवर्क सुरक्षिततेबाबत शंकाही उपस्थित केली जात होती. आता ट्विटरवर हॅशटॅग “हिंदी चिनी बाय बाय’ आणि “भारत व्हर्सेस चायना’ हे ट्रेन्डही सुरू झाले आहेत.
बुधवारी चिनी हॅंडसेट उत्पादक ओप्पोने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आपल्या फ्लॅगशिप 5 जी स्मार्टफोनचे लाईव्हस्ट्रीम रद्द केले.