कणकवली – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज २०२४ लोकसभा निवडणुकांबाबत एक मोठं भाकीत केलंय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या ४०० हुन अधिक जागा निवडून येतील असा दावा त्यांनी केलाय. कणकवली येथे शेतकरी कायद्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ आज भाजपतर्फे कणकवली येथे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार नितेश राणे व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. या रॅलीनंतर चंद्रकांत पाटलांनी उपस्थितांना संबोधित करताना, ‘केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय पाहता भाजप २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल’ असा दावा केला.
यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना, ‘आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या एका बसमध्ये सर्वजण बसू शकतील एवढी कमी असेल’ असा टोला लगावला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारची ही दुसरी टर्म आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये ३०३ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला होता. २०१४मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली प्रथम केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपने अनेक राज्यात आपक विस्तार केला आहे.