सिडनी – मार्नस लाबुशेन व पदार्पण साजरे करत असलेल्या विल्यम्स पुकोव्हस्की यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 2 गडी गमावून 166 धावा केल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे दिवसातील जवळपास 35 षटकांचा खेळ वाया गेला.
तिसऱ्या कसोटीत टीम पेनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवोदित आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सामन्याच्या तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर डेव्डिड वाॅर्नर याला चेतेश्वर पूजाराकरवी झेलबाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. डेव्डिड वाॅर्नर 5(8) धावांवर बाद झाला. मात्र, त्याचवेळी पावसाला सुरूवात झाली आणी खेळ थांबवावा लागला. दुसऱ्या सत्रात खेळ सुरु झाल्यावर लाबुशेन व पुकोव्हस्की यांनी डाव सावरला आणि दुसऱ्या विकेटसाठी 100 धावा जोडल्या. या भागीदारीदरम्यान विल पुकोव्हस्कीला रिषभ पंतकडून 2 वेळा जीवनदान मिळाले आणि पुकोव्हस्कीने याचा चांगलाच फायदा घेतला. त्याने अर्धशतक लगावलं.
विल्यम्स पुकोव्हस्की याला नवदीप सैनी याने पायचित करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. पुतोव्हस्कीने 62(110) धावांची खेळी केली. पुकोव्हस्की बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 34.2 षटकांत 106 धावा झाल्या होत्या. त्यानंतर स्टिव्ह स्मिथने लेबूशेनला साथ देत आणखी पडझड होऊ दिली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आणि काही वेळ खेळ थांबला. त्यानंतर अखेरच्या सत्रात संयमी खेळ करत स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेनने तिसऱ्या विकेटासाठी दिवसखेर 60 धावांची नाबाद भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मिथ 31 तर लाबुशेन 67 धावांवर खेळत होते.
भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 गडी बाद केला. पहिल्या दिवशी पावसाने घोळ घातला. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 55 षटकांचा खेळ होऊ शकला आणि पावसामुळे दिवसातील जवळपास 35 षटकांचा खेळ वाया गेला.