मुंबई – भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहाबे आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभर त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. यादरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. घटनेनंतर शाईफेक करणाऱ्यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शिवसेनाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आता पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘हल्ला प्रीप्लॅन होता याचे पुरावे मिळालेत. त्यामुळे गुन्हेगारी कलमांमध्ये कन्स्पायरी तयार करणे हा एक भयानक गुन्हा मानला जातो. त्याची सर्व कलमे आता लागतील.
मी सुषमा आंधारेंना म्हणालो… ‘की ताई शाईफेक करून निषेध व्यक्त करायचा होता की जखमी करायचं होतं? माझ्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावर शाई टाकली गेली. तसेच ज्या बाबासाहेबांचा अनादर झाला. शाईफेक करून बाबासाहेबांचं संविधान पायदळी तुडवलं गेलं. ही कुठली पद्धत… हा भ्याड हल्ला आहे’ असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त विधान….
पैठणमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, “देशात शाळा कोणी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्या शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करायची आहे, मला पैसे द्या. त्या काळात 10 रुपये देणारे होते. आता 10-10 कोटी रुपये देणारी लोक आहेत’, असे विधान त्यांनी केले.