वडूज – सलग चार वर्षे अडचणीत गेल्यानंतर यंदा आल्याच्या भावाने उचल खाल्ल्याने आले उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. यापूर्वी वाया गेलेला खर्च यंदा परत मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आले पिकाचा खोडवा हंगाम अंतिम टप्प्यात असताना, पुन्हा एकदा खोडव्याचा नवा, जुना अशी विभागणी करून, वेगवेगळे दर देण्याची पद्धत व्यापाऱ्यांनी पुन्हा सुरू केली आहे.
या मनमानीविरोधात अनेक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रारी केल्याने, या चुकीच्या पायंड्याविरोधात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी खटाव तालुक्यातील नेर धरण, कोरेगाव तालुक्यातील खेड, कवडेवाडी, नांदगिरी परिसरात आल्याच्या धुनीच्या ठिकाणी तपासण्या केल्या. मालाची एकाच दराने सरसकट खरेदी न केल्यास संघटनेशी गाठ आहे, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. त्याचबरोबर नवा, जुना अशी विभागणी केलेला माल पदाधिकाऱ्यांनी जप्त केला.
खेड परिसरातून उत्तर प्रदेशात पाठवण्यासाठी आले भरलेल्या ट्रकची संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तपासणी केली. त्यात विभागणी केलेल्या मालाची अनेक पोती सापडली. कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील व्यापारी महेश शेठ आणि त्यांच्या जिल्हातील एजंटांना असा प्रकार न करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी मग्रुरी दाखवल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ट्रकमधून माल खाली उतरवून तो जप्त केला. आल्याची जुनी, नवी अशी वेगवेगळी खरेदी होऊ देणार नाही, असा इशारा संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे. गेल्या हंगामात आक्रमक आंदोलने करून आणि पुणे बाजारपेठेत जाऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सौदे बंद पाडले होते. त्यामुळे विभागणीनुसार माल खरेदीची पद्धत मोडीत निघाली होती. मात्र, पुन्हा तोच प्रकार होऊ लागल्याने, विभागणी केलेला माल जप्त करण्यास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. व्यापाऱ्यांनी सरसकट माल खरेदी करून एकच बाजारभाव दिल्यास, आमची हरकत नाही, असे युवा आघाडीचे राज्य सरचिटणीस सूर्यभान जाधव यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनीही मालाच्या एकत्र खरेदीसाठी व्यापाऱ्यांकडे आग्रह धरावा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. विभागणीनुसार खरेदी आणि वेगवेगळा दर देण्याचे प्रकार घडत असल्यास शेतकऱ्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केले आहे. यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे, खटाव-माण संपर्कप्रमुख शरद खाडे, वैभव पाटील, अजय पाटील, विजय बुरुंगले, संतोष तुपे, सुभाष जाधव उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी नवे, जुने असे सौदे न करता, मालाची एकत्र खरेदी करावी, अन्यथा माल जप्त करण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस व्यापारी जबाबदार असतील. वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असताना, व्यापाऱ्यांनी नफेखोरी करू नये, अन्यथा संघटनेशी गाठ आहे.
अनिल पवार, राज्य प्रवक्ता, स्वाभिमानी संघटना.