मुंबई – राज्यात पुन्हा पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात उद्यापासून चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील चार दिवस म्हणजे 16 जुलैपर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
याबाबत भारतीय हवामान खात्याचे मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी माहिती दिली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात रविवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या ते माध्यम सरी होत असून कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली.
एकंदर राज्यात मध्यम पाऊस असेल. रडार व उपग्रह तशी स्थिती दर्शवत आहेत, असे त्यांनी ट्विट केले आहे. तसेच, आयएमडी मॉडेल नुसार 14 व 15 जुलै रोजी, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.