नवी दिल्ली – सीबीआयने मंगळवारी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांची नोकरीच्या बदल्यात जमीन या घोटाळ्याच्या संदर्भात चौकशी सुरू केली. लालूप्रसाद रेल्वे मंत्री असतानाच्या काळातील हा घोटाळा आहे. त्यात यादव कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नोकरीच्या बदल्यात जमिनी लाटल्याचा आरोप आहे. कालच त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची त्यांच्या पाटण्यातील निवासस्थानी सीबीआयने जवळपास पाच तास चौकशी केली. त्यानंतर आज लालूंची चौकशी करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी सकाळी 10.40 वाजता त्यांची कन्या मिसाभारती यांच्या पंडारा पार्कमधील निवासस्थानी आले. लालूप्रसाद सध्या तेथे मुक्कामाला आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने लालूप्रसाद, राबडीदेवी आणि इतर 14 जणांविरुद्ध गुन्हेगारी कट तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली या आधीच आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये सर्व आरोपींना 15 मार्च रोजी समन्स बजावण्यात आले आहेत.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करा – मुख्यमंत्री शिंदे
लालूप्रसाद यादव यांच्यावर नुकतीच किडनी रोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. सिंगापूर येथे ही शस्त्रक्रिया झाली असून तेथून ते नुकतेच भारतात परत आले आहेत. अशा आजारी लालूंची सीबीआय चौकशी सुरू केल्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की, जे पक्ष सरकारच्या विरोधात जातात त्यांच्यावर अशाच प्रकारची कारवाई संपूर्ण देशभर सुरू आहे. हा नवीन प्रकार नाही, सन 2024 पर्यंत हे सारे सहन करायचे आहे. त्यांच्यावरील कारवाईचा कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षानेही निषेध केला आहे.
तलावात सापडली 2.57 कोटींच्या किमतीची सोन्याची 40 बिस्कीटं! समोर आली धक्कादायक माहिती….
कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आज राबडीदेवीजींचा छळ केला जात आहे. लालूप्रसाद जी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वर्षानुवर्षे त्रास दिला जात आहे. कारण ते केंद्र सरकारपुढे झुकले नाहीत.