मुंबई – मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी चित्रपटाच्या हैदराबाद येथील सेटवर ऍक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना जखमी झाले आहेत. तथापि, आता त्यांची प्रकृती चांगली सुधारली असून त्याबद्दल त्यांनी आपल्या हितचिंतकांचे त्यांनी केलेल्या प्रार्थनांसाठी आभार मानले आहेत.
रविवारी त्याच्या ब्लॉग पोस्टमध्ये, बच्चन यांनी नमूद केले होते की, या अपघातामुळे उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याचे स्नायू फाटले आहेत. त्यावर चाहत्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि दिलेल्या शुभेच्छा व प्रेम हाच इलाज आहे. त्यामुळे माझी प्रकृती सुधारते आहे. सध्या मी विश्रांती घेतो आहे असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईला परत येण्यापूर्वी, बच्चन म्हणाले होते की, हैदराबादस्थित रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या अपघातामुळे वेदनादायक त्रास होत असून श्वासोच्छ्वास आणि हालचालींवरही मर्यादा आल्या आहेत. त्यातून पूर्ण बरे व्हायला आणखी काही दिवस लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे.