उत्तम पिंगळे
नारदमुनी स्वर्गात अवतीर्ण होतात. आजूबाजूला पाहतात तर ते नारायणांच्या महाली नसतात तर स्वर्गद्वाराशी असतात. एक सेवक चपळाईने येतो.
सेवक : देवर्षी आपले देवलोकात स्वागत.
नारदमुनी (सेवकाकडे पाहात त्याने तोंडावर भरजरी वस्त्र लावलेले असते) अरे, मी येथे कसा आहे? मी तर थेट विष्णूंच्या महाली जाणार होतो?
सेवक : क्षमा करा देवर्षी, परंतु आपण पृथ्वीतलावरून आला आहात आणि तिथे भयंकर रोगाने थैमान घातले आहे म्हणून तुम्हाला थेट स्वर्गात प्रवेश मिळाला नाही.
नारदमुनी : असं, म्हणजे मी जे पृथ्वीमध्ये पाहिलं आहे तसे स्वर्गामध्ये सुरू केले की काय?
सेवक : होय मुनीवर, आम्हाला सक्त ताकीद आहे की कोणालाही थेट आत सोडू नये.
नारदमुनी : मग आता आम्ही काय करावे सेवका?
सेवक : मुनीवर समोर जो महाल दिसतो आहे तेथे आपण जावे. तेथे आपणास आठ दिवस थांबावे लागेल. नंतर महाराज धन्वंतरी आपली नाडी परीक्षा घेतील व मगच आपणास आत प्रवेश मिळेल.
नारदमुनी : (महालाकडे चालू लागतात) पण हे कधी ठरलं?
सेवक : पृथ्वीवरील विषाणूच्या थैमानामुळे तातडीने इंद्रसभा बोलावली गेली. त्यात हे सारे संमत झाले. भगवान विश्वकर्माने तातडीने हा महाल उभारला आहे. यात सर्व सुविधा असून काहीही कमी पडणार नाही.
नारदमुनी महालामध्ये प्रवेश करतात.चेहरा झाकलेले सेवक व सेविका आपापली कामे करत असतात. नारदमुनी विशेष कक्षात जातात. त्यांना वेळेवर फलाहार व भोजन दिले जाते. नारदमुनी विचार करू लागतात की, देव लोकांनीही पृथ्वीवरील विषाणूचा धसका घेतलेला दिसत आहे. पृथ्वीतलावर तर खरोखरच हाहाकार माजलेला आहे. त्यात जंबूद्विपावर तर भयाण परिस्थिती आहे. इतक्यात एक सेवक गरमागरम दूध घेऊन येतो.
सेवक : मुनीवर, हे घ्या गरमागरम दूध.
नारदमुनी : (चषक हातात घेत असतानाच) बरं सर्वांसाठी हाच नियम आहे की कुणाला सवलत वगैरे?
सेवक : फक्त यमराज सोडून सर्वांना हा नियम लागू आहे. कारण यमराजांचे काम एवढे वाढले आहे की, त्यांना सतत पृथ्वीतलावर जावे लागते. त्यामुळे ते पृथ्वीतलावरून आल्या आल्या थेट या महाली येतात. मग महाराज धन्वंतरी त्यांची तातडीने परीक्षा घेऊन त्यांना त्यांच्या महाली जाऊ देतात.
(आठवडाभराने धन्वंतरी येऊन नारदमुनींची नाडी परीक्षा घेतात व सर्व ठीक आहे म्हणून त्यांना विष्णू महाली जाऊ देतात.)
नारदमुनी : नारायण… नारायण… हे नारायणा, आता आपली भेट घेण्यासाठी सुद्धा मला आठ दिवस बाहेर थांबावे लागले. एकूणच गंभीर प्रसंग आहे.
भगवान विष्णू : हे नारदा, आम्ही सर्व जाणून आहोत आणि म्हणूनच सध्या येथेही कायदे कडक केले आहेत. मानवानेच हा विषाणू तयार केलेला आहे आणि आता त्याचे परिणाम दिसत आहेत.
नारदमुनी : हे केशवा, पण जंबूद्विपावर आपल्या देवादिकांची पूजाअर्चा सर्वात जास्त होते आणि तेथेच आता कहर झाला आहे. आपणच काहीतरी करावे.
भगवान विष्णू : होय मुनीवर, तसेच आता बाळ गजाननासही दहा दिवसांकरता पृथ्वीतलावर जावे लागेल, म्हणून आम्ही त्यास साकडे घातले आहे.
नारदमुनी : मग काय म्हणाले गणाधीश?
भगवान विष्णू : हे नारदा, गजाननाने सांगितले की, प्रत्येक गोष्टीचा काळ, वेळ ठरलेली आहे. लवकरात लवकर वैज्ञानिक या रोगावर मात करण्याचा उपाय शोधतील. मगच पृथ्वीतलावर सर्व पूर्ववत होण्यास सुरुवात होईल.
नारदमुनी : नारायण… नारायण… हे उत्तम. आता कैलासपतींनाही भेटून येतो. (असे म्हणून निघतात…)