मांजरी खुर्द/ वाघोली – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत कोलवडी-मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील परिसरातील प्रस्तावित स्मार्ट नगर रचना परियोजना अर्थात टीपी स्कीम व येथूनच जाणाऱ्या रिंगरोडला जागा देण्यास शेतकऱ्यांनी नकार देत या योजनेला विरोध दर्शविला आहे. आम्ही टीपी स्किम आणि रिंगरोडला आमच्या जमिनी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत मांजरी खुर्दच्या शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदन दिले आहे. निवेदनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मांजरी खुर्द परिसरात टीपी स्किम आणि रिंगरोडला शेतकऱ्यांच्या चालू बागायती शेती संपादन करण्यात येणार आहेत. मात्र, येथील मुख्य व्यवसाय हा शेतीच असून आम्ही आमची शेती या योजनेला देणार नाही. अशी आग्रही भूमिका अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहे. “पीएमआरडीए’ने आम्हाला मागणी केलेली जमीन दिल्यास मोठे नुकसान होणार आहे. आम्हांला हे मान्य नाही. त्यामुळे आमचा या योजनेला विरोध आहे. असे मांजरी खुर्द आणि कोलवडी येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत निवेदन अजित पवार यांना देण्यात आले आहे.
उपसरपंच प्रकाश सावंत म्हणाले की, पीएमआरडीए रिंगरोडला आणि टीपी स्किमला आमच्या ज्या जमिनी संपादन करणार आहेत. त्या जमीनी आम्ही कसत असून शेती करीत आहोत. त्यामुळे या जमिनी आम्ही देणार नाहीत. आमदार सुनील टिंगरे, अशोक पवार, मांजरी खुर्दचे ज्येष्ठ शेतकरी दगडूभाऊ उंद्रे, उपसरपंच प्रकाश सावंत, ग्रामपंचायत सदस्य किशोर उंद्रे, लक्ष्मण उंद्रे, आप्पासाहेब माने, संतोष मुरकुटे, अभिजित उंद्रे, सचिन उंद्रे, हनुमंत उंद्रे यांनी अजित पवार यांची पुण्यात प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे.