पाटणा – अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या लष्करातील भरतीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याकरता 1 जुलैपासून अर्ज येण्यास सुरुवातही झाली आहे. दरम्यान, या अर्जासोबत उमेदवारांकडून विविध कागदपत्रे मागवण्यात आली असून, त्यासोबत जातीचे प्रमाणपत्रही मागवले जाते आहे. त्यावरून बिहारमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाच्या नेत्याने संरक्षण मंत्र्याला सवाल विचारला आहे.
या पक्षाच्या बिहारच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य उपेंद्र कुशवाह यांनी एक ट्विट करून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे याकडे लक्ष वेधले आहे. लष्करात भरतीसाठी आरक्षणाची कोणतीही तरतूद नसताना आता अग्निवीरच्या भरतीसाठी जातीचे प्रमाणपत्र का मागितले जाते आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याचे स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे कुशवाह यांनी म्हटले आहे.
राज्यातही क्रॉस व्होटिंग?; कॉंग्रेस, राष्ट्रवादीत धुसफूस
अग्निपथअंतर्गत युवकांची लष्करात भरती केली जाणार आहे. त्यांचा कालावधी केवळ चार वर्षांचा असणार आहे. भरती करण्यात आलेल्या युवकांपैकी केवळ 25 टक्के युवकांना कायम केले जाणार असून, उर्वरित 75 टक्के जणांना निवृत्त केले जाणार आहे. मात्र, त्यांना अन्यत्र सामावून घेतले जाणार असल्याची हमी सरकारच्या विविध विभागांनी दिली आहे.