नवी दिल्ली – लष्करी प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या तंदुरुस्तीविषयक समस्यांमुळे वैद्यकीय कारणांवरून अपात्र ठरणाऱ्या कॅडेट्सना पुनर्वसन सुविधा देण्याच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
सशस्त्र दलांमध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याच्या हेतूने कॅडेट्स अगदी तरुण वयात लष्करी अकादमींमध्ये प्रवेश घेत असतात आणि गणवेशात देशाची सेवा करण्याची वचनबद्धता प्रदर्शित करत असतात, मात्र, अपात्रतेमुळे दुर्दैवी ठरतात.
अनेक दशकांपासून कॅडेट्स, त्यांचे पालक यांच्याकडून अशा प्रकारच्या पुनर्वसन संधींची मागणी केली जात होती. दरवर्षी तरुण कॅडेट्स सशस्त्र दलांमध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याच्या हेतूने, लष्करी अकादमींमध्ये शैक्षणिक आणि लष्करी प्रशिक्षण घेत असतात.
सध्या लागू असलेल्या नियमांनुसार केवळ नियुक्तीनंतरच अशा कॅडेटना अधिकारी हा दर्जा प्राप्त होतो. मात्र, काही वेळा वर्षाला १० ते २० कॅडेट्स खडतर लष्करी प्रशिक्षणामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या तंदुरुस्तीविषयक समस्यांमुळे वैद्यकीय कारणांवरून अपात्र ठरतात.
अशा कॅडेट्सना जास्त संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माजी सैनिक कल्याण विभागाच्या आणखी एका प्रस्तावाला संरक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे, ज्यानुसार त्यांना पुनर्वसन महासंचालनालयाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांचे लाभ दिले जाणार आहेत.
वैद्यकीय कारणांवरून अपात्र ठरवण्यात आलेल्या ५०० कॅडेट्सना या मंजुरीमुळे योजनांचे लाभ मिळणार आहेत. अशाच परिस्थितीतील भावी कॅडेट्सना देखील हेच लाभ लागू होतील.