दिवाळी काळात फुफ्फुसाचा संसर्ग सांभाळावा लागणार
पुणे – करोना बाधितांची संख्या कमी झाली असली, तरी ज्यांना करोना होऊन गेला आहे किंवा जे फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांना दिवाळी काळात स्वत:ला जपावेच लागणार आहे. फटाक्यांच्या धुरामुळे या नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दिवाळीत फटाके उडवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून आवाज नको, आवाजाचा त्रास नको असे म्हणताना विना आवाजाचे केवळ शोभेचे फटाके तेही आकाशात आतषबाजी करणारे फटाके उपलब्ध झाल्याने अनेकजण ते घेणे पसंत करतात. परंतु त्यामुळे सर्वाधिक जास्त हवेचे प्रदूषण होते, हे त्यांच्या गावीही नसते. परंतु यावर्षी परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
करोना बाधितांची संख्या ही दीड लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यातील बहुतांश बरे झाले असले, तरी अनेकांना फुफ्फुसांना संसर्ग झाल्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवली होती. ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर लावून त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. करोनाने आता प्रत्येकाला एका श्वासाची किंमत काय असते, हे समजले आहे आणि तो मिळवण्यासाठी काय काय करावे लागते, हे समजले आहे.
ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था अजितदादांकडे नागरिकांनी फटाक्याविना दिवाळी साजरी करावी, असे आवाहन काही संस्था, संघटनांनी, ज्येष्ठ नागरिकांच्या संघाने केले आहे. फटाक्यांच्या धूरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार होतात याविषयीचे अनेक अहवाल आहेत. त्यातून शोभेच्या दारूमुळे धूर आणि वायूप्रदूषण मोठ्याप्रमाणात होते. म्हणून आधीच काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्य सणांप्रमाणेच दिवाळी साजरी करण्यासंबंधीची जी आचारसंहिता असेल, त्यात दिवाळीत फटाके आणि शोभेची दारू उडवण्याला बंदी घालावी, अशी मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.