नवी दिल्ली: जगभरात करोनाने कहर केला आहे. किमान 30 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, असे असले तरी, भारत सरकार जे उपाय योजत आहे, त्याचा परिणामस्वरुप येत्या 20 मे पर्यंत भारतातील साथरोगाच्या विषाणूचा संसर्ग नष्ट होईल, असा दावा सिंगापूर यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी ऍण्ड डिजाइन यांच्याकडून करण्यात आला आहे.
कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस या तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातल्या करोना-बाधितांचे आकडेवारीचे जे विश्लेषण केले आहे त्यानुसार हा दावा करण्यात आला आहे. भारतातून 20 मेपर्यंत करोनाचा नाश होईलच; शिवाय तर वेगवेगळ्या देशांमध्ये लवकरच या व्हायरसचा नाश होईल, असे या विद्यापीठाच्या संशोधकांच्या पथकातर्फे सांगण्यात आले आहे.
येत्या 16 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला तर करोनाचे रुग्ण आढळणार नाहीत, असे याआधी शुक्रवारी सरकारकडून सांगण्यात आले आहे. असे केल्याने करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या साथरोगावर भारत लवकर नियंत्रण मिळवू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
या जीवघेण्या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तोपर्यंत अपेक्षित यश मिळाल्यास, साथ नियंत्रणासाठीचे उपाय, हॉटस्पॉट वगळता, शिथिल करता येतील, असे सरकारचे म्हणणे आहे.