सोलापूर – मतदानाला काही तास शिल्लक राहिले असतानाच उमेदवाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायबाण्णा बिराजदार (वय-58, रा. खैराट, ता. अक्कलकोट) असे मयत उमेदवाराचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खैराट ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सायबण्णा बिराजदार यांनी गावातील एका वार्डातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजयी होण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. गुरूवारी त्यांना अचानक ऱ्हदयाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मतदानाच्या दिवशीच शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ज्या वार्डातून मयत सायबण्णा बिराजदार यांनी उमेदवारी दाखल केली होती, त्या वार्डासाठीची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.