नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे (का) झालेल्या आंदोलनाला देशव्यापी स्वरूप येऊ लागल्याने ते रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीच्या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती हाती येत आहे. या बैठकीत हे आंदोलन घ्यायची काळजी आणि आंदोलकांबाबतची भूमिका याबाबत सुचना देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गृहमंत्री अमित शहा स्वत: या बैठकीत मार्गदर्शम करणार आहेत, असे समजते.
सुधारित नागरिकत्व विधेयक मंजूर होताच ईशान्य भारतात प्रथम हिंसेचा भडका उडाला. त्यानंतर तेथे लष्कर तैनात करण्यात आले. तेथील इंटरनेट आणि मोबाईल सेवा खंडित करण्यात आली. मात्र नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनामुळे या कायद्याल देशभरातून विरोध होऊ लागला. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र उभे रहात आहे. त्यामुळे या आंदोलनाबाबत कोणत्या सुचना देण्यात येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
झारखंडमधील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यांनी या कायद्याचे समर्थन केले. आंदोलकांच्या वेशभुषेवरून हे आंदोलक कोण आहेत, हे समजते, असे मोदी म्हणाले होते. तर तुम्ही कितीही आंदोलन करा आम्ही हा कायदा राबवणारच, असे समर्थन शहा यांनी केले.