राजगुरूनगर -पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे असून येत्या सप्टेंबरपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित होते. त्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सात्यत्याने पाठपुरावा करून खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्याची रविवारी (दि. 19) आढळराव यांनी माहिती घेत पहाणी केली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, आंबेगाव तालुका शिवसेना प्रमुख अरुण गिरे, रोडवेज सोल्युशन पुणेचे व्यवस्थापक संतोष घोलप, बबलू काजळे, बाळासाहेब सांडभोर, तुकाईवाडीचे साहेबराव थिगळे उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, खेड ते सिन्नर या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. ती सोडविण्यासाठी 2007-08 पासून पाठपुरावा सुरू होता. मात्र, अनंत अडचणींमुळे काम रखडत होते. दरम्यान, बाह्यवळण लवकर होणे गरजेचे होते त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून अडचण सांगितली. त्यांनी खेड घाट आणि नारायणगाव बाय पासला मंजुरी दिली.
नोव्हेंबर 2018 मध्ये टेंडर काढली. 8 मार्च 2019 ला 82 कोटी रुपयांचे काम रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. दुर्दैवाने लोकसभा निवडणूक झाल्याने हे काम रखडले; मात्र जुलै 2019 मध्ये या कामाला गती आली हे काम करणाऱ्या कंपनीकडून युद्धपातळीवर सुरु केले ते आता पूर्णत्वाकडे आहे आहे.
खेड घाटातील झणझणवस्ती जवळील मोठ्या पुलामुळे हे काम रखडले होते, येथे 8 मीटर उंच, 11 मीटर रुंद आणि 80 मीटर लांब पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने लवकरच रस्ता वाहतुकीला खुला होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नारायणगावचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार
नोव्हेंबरमध्ये नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण करून मार्ग खुला होणार आहे. मोठा पूल आणि छोटा पुलाचे काम पूर्ण होणार आहे. राजगुरूनगर, मंचर बाह्यवळणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. ही कामे झाल्यास वाहतूक अजून सुरळीत होणार आहे. नारायणगाव व आळेफाटामधील बाह्यवळण रस्त्याची कामे पूर्ण केली जाणार आहेत त्यासाठी सततचा पाठपुरावा सुरूच आहे.
…तरी पाठपुरवा सोडला नाही
पुणे-नाशिक महामार्गाचे काम रखडले यावर लोकसभेची निवडणूक झाली. यात महामार्गावरील वाहतूककोंडी प्रश्न गाजला. दुर्दैवाने हा ठपका बसून मला पराभवाला सामोरे जावे लागले. याही स्थितीत या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा सोडला नाही. केंद्राकडे सततचा पाठपुरावा करीत राहिलो. कामातील अडचणी सोडवल्या. त्यामुळे आता खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. 2007 पासून आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक पाठपुराव्याला यश आले आहे.