भावही वाढले : किराणा दुकाने, बेकरीत तुलनेने गर्दी कमी
पुणे – पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर भाजीपाला खरेदीसाठी पुणेकरांनी महात्मा फुले मंडईसह किरकोळ विक्रेत्यांकडे नागरिकांनी गर्दी केली होती. त्या तुलनेत किराणा दुकाने, बेकरीमध्ये कमी गर्दी होती.
मार्केट यार्ड बंद असल्याने शहरात भाज्यांचा पुरवठा कमी होता. बाहेरगावाहून टेम्पो, टमटममध्ये आणून अनेक भाज्यांची विक्री झाली. किरकोळ विक्रेत्यांकडे तुलनेने कमी माल उपलब्ध होता.
परिणामी, किरकोळ बाजारात मालाचे भाव चढेच होते. साधारणपणे 25 ते 40 रुपये पाव किलो भावाने भाज्यांची विक्री झाल्याची माहिती किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी कवडीमोल भावाने विक्री होणाऱ्या लिंबू, कोथिंबिरी, काकडी आणि टोमॅटोला मांसाहारी नागरिकांकडून मागणी वाढली होती. लिंबाच्या नगास 5 ते 7 रुपये मोजावे लागले. तर, कोथिंबिरीच्या जुडीस 20 ते 40 रुपये मोजावे लागले. काकडीची 15 ते 25 रुपये, टोमॅटोची 20 ते 25 रुपये, तर हिरव्या मिरचीची 10 ते 40 रुपये पाव किलो भावाने विक्री झाली. बिर्याणीसाठी लागणाऱ्या पुदिनाच्या जुडीसाठी 20 ते 40 रुपये मोजावे लागत असल्याचेही ढमढेरे यांनी सांगितले.