नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत पूर्ण होत आहे. त्याच बरोबर ९७ ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवारी (दि.२३) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.
जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ या वर्षामध्ये पूर्ण होत आहे. या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी अद्ययावत करणे ही कामे प्रशासनाने मार्गी लावली आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्यू, नियमांचे उल्लंघन झाल्याने अपात्र, राजीनामा, अशा विविध कारणांमुळे ९७ ग्रामपंचायतींमधील १४७ ग्रामपंचायत सदस्यत्वाच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती आणि कंसात सदस्य संख्या याप्रमाणे
अकोले ४३ (८४), संगमनेर ८ (१०), कोपरगाव ५ (६), श्रीरामपूर ३ (३), राहाता ३ (३), राहुरी ३ (४), नेवासे ३(७), नगर ५ (५), पारनेर ४ (४), पाथर्डी ४ (४), शेवगाव ८ (८), कर्जत १(१), जामखेड ५ (६), श्रीगोंदे २ (२) निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मतदारांची प्रत्यक्ष भेटी घेण्यास प्रारंभ केला आहे. काही ठिकाणी मतदारांना देवदर्शन सहलीचे आयोजन केले जात आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती याप्रमाणे
अकोले- २, संगमनेर- १, कोपरगाव -३, श्रीरामपूर -२, राहुरी- २, नेवासे -२५, नगर- १, पारनेर- १, पाथर्डी -४, शेवगाव- ६, कर्जत -१८, जामखेड -३, श्रीगोंदे -२ अशा ६९ ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.