ढाका – बांगलादेशात पुन्हा एकदा भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आभियान छेडले गेले आहे. मात्र या भारतद्वेषाला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणाऱ्यांनी आगोदर आपल्या पत्नीच्या भारतीय साड्या जाळून टाकाव्यात, असे त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
भारतीय उत्पादनांना विरोध करणाऱ्यांपैकी किती जणांनी पत्नीच्या भारतीय साड्या जाळल्या आहेत. जर जाळल्या नसतील तर आतापर्यंत का या साड्या जाळल्या नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आवामी लीगच्या एकत्रीकरणामध्ये त्या बोलत होत्या.
विरोधी बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे, त्यावर त्यांनी टीका केली. जेंव्हा बीएनपी सत्तेत होते, तेंव्हा या पक्षाच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या भारत भेटीमध्ये पत्नींसाठी भारतीय साड्या खरेदी केल्या होत्या.
त्या साड्या बांगलादेशात आणून विकल्याही होत्या. भारतातील मसाले भारतातूनच येतात. हे पदार्थ देखील बीएनपीच्या नेत्यांच्या घरच्या स्वयंपाकघरात दिसता कामा नयेत, असेही त्या म्हणाल्या. भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करताना बीएनपीचे नेते राहुल कबीर रिझवी यांनी आपली काश्मीरी शाल रस्त्यावर फेकून दिली होती.
भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी इंडिय. आऊट हे अभियान तेथील विरोधकांनी सुरू केले आहे. बांगलादेशात अलिकडे झालेल्या निवडणुकीत आवामी लीगचा विजय झाल्यावर बीएनपीने हे अभियान पुन्हा सुरू केले आहे.