नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने सोमवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. राहुल यांच्या मॅच-फिक्सिंग विषयीच्या वक्तव्यावर आक्षेप घेऊन भाजपने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
इंडिया आघाडीची रविवारी दिल्लीत सभा झाली. त्यामध्ये बोलताना राहुल यांनी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून निवडणुकीत मॅच-फिक्सिंगचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यावर आक्षेप घेत भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला.
त्या शिष्टमंडळाचा भाग असणारे केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना भाजपची भूमिका मांडली. लोकसभा निवडणूक फिक्स्ड मॅच असल्याचे राहुल यांनी म्हटले.
केंद्र सरकारने निवडणूक आयोगात आपली माणसे तैनात केली असल्याचे त्यांनी म्हटले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यांची वक्तव्ये अतिशय आक्षेपार्ह स्वरूपाची आणि आचारसंहितेचा भंग करणारी आहेत.त्या वक्तव्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे पुरी म्हणाले. राहुल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्ये करत असल्याचा प्रत्यारोपही भाजपने केला.