जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा शिवसेना भाजप युतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. गेल्या काही वर्षांतील राजकीय समीकरणांने युतीचे समीकरण बदललेले असले तरी या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचेच वर्चस्व पाहायला मिळाले.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीमुळे हा जिल्हा यावेळी नेमका कुणाच्या बाजूने उभा राहतो. कोणत्या शिवसेनेची शक्ती अधिक ठरते यावर सर्व समीकरणे अवलंबून असणार आहेत. यावेळी जागावाटपाचा विचार करता महायुतीने मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे.
घोषणा होईपर्यंत उन्मेष पाटील यांचीच उमेदवारी कायम राहणार असा विश्वास व्यक्त केला जात होता. पण भाजप नेतृत्वाने जळगाव मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करत ऐनवेळी स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा केली.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे राहणार असल्याचे समोर येत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ताकदीचा उमेदवार नसल्याचे कारण दिले जात आहे.
तिकिट कापल्याने नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांच्या नाराजीचा फायदा घेत उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या पत्नीलाच रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळे उमेदवारीचे हे गणित स्पष्ट झाल्यानंतर याठिकाणच्या लढतीचे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट होईल.