दुबई, दि. 26 – भारतात कोविडची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, अशा स्थितीत भारताला सहानुभूती दर्शवण्यासाठी येथील बुर्ज खलिफा या सर्वात उंच अशा इमारतीवर तिरंग्याचे लाईटिंग करण्यात आले होते. अशीच तिरंगा ध्वजाची लाईटिंग व्यवस्था अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनीच्या मुख्यालयावरील इमारतीवरही करण्यात आली होती.
संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावासाने याची दखल घेऊन आपल्या ट्विटर अकौंटवरही ही माहिती प्रसारित केली आहे. त्याबद्दल भारताचे तेथील राजदूत पवन कपूर यांनी संयुक्त अरब अमिरातीचे आभारही मानले आहेत. अबुधाबीच्या राष्ट्रीय तेल कंपनीने भारताला उद्देशून खंबीर राहा, असा संदेश दिला आहे.
दरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे विदेश मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांनी भारत लवकरच या आपत्तीतून बाहेर येईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. त्यांनी या बाबतीत भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तसेच भारताला आवश्यक ती मदत देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.