रांजणी -बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी झालेली आंदोलने आणि बैलगाडा शर्यती आयोजित केल्यामुळे दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना निर्देश देऊन दाखल केलेल्या गुन्ह्याबाबतची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेतले जातील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथे बैलगाडा शर्यतीना वळसे पाटील यांनी भेट दिली, यावेळी वळसे पाटील बोलत होते. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब बाणखेले, गणपतराव इंदोरे, दत्ता थोरात सुहास बाणखेले,भाऊसाहेब सावंत पाटील, शिवाजीराव निघोट, सरपंच नवनाथ निघोट, बाबाजी टेमगिरे उपस्थित होते.
यावेळी वळसे पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही शर्यती सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये माझाही खारीचा वाटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही अटी-शर्ती घालून परवानगी दिलेली आहे.
अजून याचा अंतिम निर्णय न्यायालयात होणार आहे. तोपर्यंत अटी व शर्तीचे कुठल्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही. भविष्यात काही अडचण निर्माण होणार नाही. याची काळजी आयोजकांनी तसेच बैलगाडा मालकांनी घ्यावी. निघोटवाडी येथे बैलगाडा शर्यतीसाठी स्टेडियमसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिवाजीराव निघोट म्हणाले की, निघोटवाडीच्याच सर्वांगीण प्रगतीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्यामुळेच येथील स्टेडियमचा प्रश्न मार्गी लागणार आहे.