कोपरगाव – कोपरगाव तालुक्यात एचआयव्ही बाधितांचा आकडा एका बाजूला कमी झाल्याने समाधानाचे वातावरण असले तरी काही एचआयव्ही बाधित रुग्ण आरोग्य यंत्रणेशी संपर्क न ठेवता लपून राहत असल्याने त्यांच्यापासून पुन्हा इतरांना संसर्ग होण्याची शक्यता वाढल्याने तालुक्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सध्या या रुग्णांचा शोध घेत आहे.
एचआयव्ही बाधितांपैकी काहींनी आरोग्य यंत्रणेला खोटे बोलून चुकीचा पत्ता, चुकीचा संपर्क नंबर देऊन लपून राहण्यात धन्यता मानत आहेत. मात्र याचा थेट परिणाम त्यांच्या आयुष्यावर होणार आहे. शासकीय औषधे मोफत असूनही जर ती वेळेवर योग्य सल्ल्याने घेतल तर त्यांचे आयुष्यमान वाढणार आहे. जितके दिवस लपून राहतील, तितके दिवस स्वतःसह इतरांना धोक्याचे असणार आहे.
सध्या तालुक्यात 1 हजार 73 व्यक्ती एचआयव्ही बाधितांपैकी 573 पुरुष व 499 स्त्रियांचा समावेश आहे. त्यापैकी 166 बाधित मयत झाले आहेत. मयतामध्ये पुरुष 105, स्त्री 54 इतर 1, गरोदर माता 6 होत्या. तालुक्यात सध्या कागदोपत्री शासनाकडे 1 हजार 75 बाधितांची नोंद असून त्यात 575 पुरुष व 500 स्त्रियांचा समावेश आहे, मात्र लोणी येथील प्रवरा शासकीय रुग्णालयाकडून तब्बल 205 बाधित रुग्ण उपचाराला येत नसून त्यांचा संपर्क होत नसल्याने त्या त्या तालुक्यातील आरोग्य यंत्रणेकडून शोध घेण्याचे फर्मान सोडले आहे. गायब बाधितांमध्ये तालुक्यातील 97 व्यक्तींचा समावेश आहे.
एचआयव्ही बाधीतांना शासनाच्या वतीने एका व्यक्तीला 6 हजार रुपयांचे औषध मोफत घरपोच दिले जातात. शिवाय बाधित व्यक्तीची वैयक्तीक माहिती व नाव अतिशय गुप्त ठेवली जाते. बाधित व्यक्तींच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्ती शिवाय कोणतीच माहिती इतरांना कळू दिली जात नाही, असे असतानाही काही नागरीक जाणुनबुजून वेळेवर औषधे घेत नाहीत. शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क ठेवत नाहीत, अशी खंत आरोग्य समुपदेशक योगेश खुर्दळ यांनी व्यक्त केली.
एका व्यक्तीला वर्षाला सरासरी वार्षिक 72 हजार रुपयांचे औषधे मोफत घरपोच दिली जातात. गायब झालेल्या बाधितांची शोध मोहिम तालुक्यात सुरू केली असून गावपातळीसह शहरातील प्रत्येक यंत्रणेच्या माध्यमातून बाधितांचा शोध सुरू केला आहे. काही खासगी डॉक्टर, वैद्यकीय प्रयोगशाळा तज्ञ यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
बाधित व्यक्ती वैद्यकीय तपासात निष्पन्न झाल्यानंतर जर संबंधितांनी शासकीय यंत्रणेला कळवले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. काही खासगी डॉक्टर व्यक्ती संबध जपण्यासाठी किंवा आर्थिक संबंधाच्या लालसेपोटी उपचारा दरम्यान एचआयव्ही तपासणी केल्यानंतर ते ढळलेल्या रुग्णाची माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेला कळविण्याऐवजी गुपचूप उपचार करीत असावे म्हणूनच बाधित रुग्ण गायब असावेत, असा अंदाज आरोग्य यंत्रणेने वर्तवला आहे. सन 2011 पासून अनेक बाधित रुग्ण गायब आहेत
दरम्यान, काही प्रतिष्ठित बाधित व्यक्ती आपला तालुका जिल्हा सोडून इतर ठिकाणी जावून स्वखर्चाने गुपचूप औषधोपचार करून घेत आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेला चुकीचा संपर्क नंबर दिल्याने संपर्क होत नाही. शिवाय स्थानिक पत्ता चुकीचा दिल्याने आरोग्य यंत्रणेचा व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.