यवत -येथील साईनगर भागातील महिलांना रोज पिण्याच्या पाण्यासाठी जीव धोक्यात घालून सुमारे एक -दीड किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे महिलांचा जीव रडकुंडीस आला होता. याबाबत महिलांनी ग्रामपंचायतीला असुविधेबाबत कळविले होते. आता येथील पाणीप्रश्न निकालात निघणार आहे. मात्र, त्यापूर्वीच श्रेयवादाची किनार दिसत आहे.
यवत परिसरातील साईनगर भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिला, नागरिकांना धावाधाव करावी लागत होती. दीड किलोमीटर पायपीट केल्यानंतर सर्वसामान्यांचा जीव कासावीस होत होता. याबाबत साईनगरमधील महिलांनी या पाणीप्रश्नावर मार्ग काढावा, अशी मागणी केली. या पाणी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. लवकरच साईनगर व इंदिरानगर भागातील नागरिकांना नळ कनेक्शन देण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर जोरदार हालचाली सुरु आहेत.
पुढील काही दिवसात हा पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, गणेश शेळके यांनी येथील कुटुंबाना जागेची पाहणी करून दिले. साईनगर आणि इंदिरानगर येथील ही सर्वसामान्य कुटुंबातील असून रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणारी आहेत. दिवसाची सुरवातच पाण्यासाठी पायपीटीने करावी लागत आहे.
साईनगर येथील टाकीचा प्रश्न सोडविण्यासाठी भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक सुरेश शेळके यांच्या संकल्पनेतून ओंकार शेळके यांनी आपल्या स्वमालकीची दोन गुंठे जागा ग्रामपंचायतला बक्षीसपत्राद्वारे देण्याचे कबूल केले आहे. राष्ट्रवादीचे समर्थक सदानंद दोरगे व भाजपाचे गणेश शेळके यांच्यात राजकीय चढाओढ रंगलेली दिसत आहे.