लग्न सोहळ्यांवर गदा : बुकिंगचे रिफंड मिळूनही टेन्शन
पुणे – करोनाने राज्यातील शहरी भागात हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. ग्रामीण या भागातील यात्रा, सभारंभ, पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच आता विवाह सोहळ्यासह उर्वरित मोठे सोहळेही स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे वर-वधू पित्यांची चिंता वाढली आहे. कधी हे विघ्न जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.
लग्नसोहळ्यांचा थाट विशेषत: ग्रामीण भागात अधिक असतो. मार्चपासून सुरू होणारे लग्न सोहळे अगदी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहतात. जिल्ह्यातील शेकडो वर-वधुंचे लग्न ठरले आहे; मात्र करोनामुळे हे लग्नसोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी मनमानी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर असे ग्रामीण भागातील चित्र आहे.
दरम्यान, या लग्नसोहळ्यामुळे केटरर्सकडे कामाला आलेले आचारी, कामगार, वाढपी, डेकोरेशन वाले, वाजंत्री बॅंडवाले, कार्यालयचालक, मंडपवाले त्यांचे कामगार यांचे रोजगार बुडाल्याने त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर काही वधू -वरांचे विवाह ठरले आहेत व लग्न तारीख ठरली असूनही, लग्न मात्र न करता येण्याचीच शक्यता वधू पित्याची चिंता वाढवणारी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
“ते’ विवाह सोहळे ठरले फायद्याचे
अनेक वधू पित्यांनी साधेपणाने लग्न उरकण्यावर भर दिला आहे. अशा लग्न सोहळयांसाठी अत्यंत कमी लोक जमा झाल्याने मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेशन बॅंड आणि जेवणावळींचा फार मोठा खर्च वाचला आहे. लग्नसोहळे अत्यंत साधेपणाने दारासमोरच किंवा गावातील मंदिरात उरकण्यात आले. त्यामुळे ज्या वधू पक्ष किंवा वर पक्षाकडे लग्नसोहळा पार पाडण्याचे ठरले होते ते लग्नाचा होणारा अनाठायी खर्च वाचला आहे.