सातारा – जमिनीच्या वारस नोंदी करण्यासाठी कराड तालुक्यातील एकाकडून लाच घेणारा कराड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक वैभव चंद्रकांत पाटील (वय 37, रा. मलकापूर, ता. कराड) व श्रीधर संजय माने (रा. वाघिरे, ता. कराड) या खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा येथील पथकाने बुधवारी रंगेहाअ पकडले. वैभव पाटील याने तक्रारदाराकडून 32 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील 22 हजार रुपये यापूर्वी घेतले होते. उर्वरित दहा हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या चुलत्याची जमीन आहे. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारस नोंदी करण्यासाठी कराडच्या भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. तो अर्ज निकाली काढून वारसांची नोंद करण्यासाठी वैभव पाटील याने त्यांना 32 हजार रुपये मागितले होते. त्यापैकी 22 हजार रुपयांचा पहिला हप्ता त्याने घेतला होता. उर्वरित रक्कम दिल्याशिवाय वारस नोंद होणार नसल्याचे पाटील याच्यावतीने खासगी व्यक्ती माने याने तक्रारदाराला सांगितले होते. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी करून कराड येथे बुधवारी सापळा लावला. त्यावेळी वैभव पाटीलसाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी श्रीधर माने याला रंगेहाथ पकडले. दोन्ही संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक नितीन जगताप व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.