कोपर्डे हवेली -कोपर्डे हवेली, ता. कराड येथे बुधवारी दुपारी रेल्वे फाटक पार करताना ऊस वाहतुकीच्या बैलगाडीचे चाक अचानक तुटले. नेमकी त्याच वेळी कराड-ओगलेवाडी स्टेशनवरून साताऱ्याच्या दिशेने भरधाव निघालेली रेल्वे अर्धा किलोमीटरवर आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत लाल झेंडे दाखवून रेल्वे थांबवल्याने सुदैवाने भीषण रेल्वे दुर्घटना टळली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रेल्वे भुयारी मार्गाबाबत कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची खा. श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी बुधवारी बैठक होती. ही बैठक आटोपून विकास थोरात व शेतकरी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मसूरमार्गे कोरेगावकडे निघाले होते. ते कोपर्डे हवेली येथील रेल्वे फाटकाजवळ आले असता, ऊस वाहतूक करणारी बैलगाडी रुळ ओलांडत होती. त्यावेळी बैलगाडीचे चाक रूळावर अचानक तुटले आणि गाडी रूळावर बरोबर मध्यभागी अडकली.
त्याच वेळी अजमेर-म्हैसूर रेल्वे येत असून बैलगाडी पुढे घेण्यास रेल्वे गेटमन सांगत होता; परंतु गेटमन ज्या बाजूला उभा होता, त्याच्या विरुद्ध बाजूला बैलगाडीचे चाक तुटलेले असल्याने ते गेटमनला दिसले नव्हते. ही बाब विकास थोरात व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर ते धावत गेटमनच्या दिशेने गेले. त्यांनी गेटमनला घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर लाल झेंडे घेऊन हे सर्व जण रेल्वे रूळावरून कराडच्या दिशेने पळत गेले. तोपर्यंत रेल्वे चारशे मीटर अंतरावर आली होती. विकास थोरात, जयसिंग जाधव, अजय बापू कदम, सुरज कदम, अमोल पाटील, विकास पाटील व अन्य शेतकऱ्यांकडे असलेले लाल झेंडे पाहून मोटारमनने रेल्वेचा वेग कमी करत बैलगाडीपासून अवघ्या 100 फुटांवर रेल्वेगाडी थांबवली. त्यावेळी शेजारच्या वीजभट्टीवरील ट्रॅक्टरच्या सहाय्याने रुळावर अडकलेली बैलगाडी बाहेर काढण्यात आली. त्यानंतर काही मिनिटांत रेल्वे पुढे गेली. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे दुर्घटना टळली.