729 रिक्त पदांसाठी दोन महिन्यांतरही परीक्षा नाही : उमेदवारांमधून नाराजी
पुणे – पूरस्थितीचे कारण देत पशुसंवर्धन विभागाने नोकरभरतीच्या परीक्षेबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. परीक्षा रद्द होऊन दोन महिने उलटूनही उमेदवारांना कोणत्याही सूचना करण्यात न आल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला आहे. महापरीक्षातर्फे नव्या भरतीप्रक्रिया सुरू झाल्या असून पशूसंवर्धनाच्या परीक्षेचा निर्णय मात्र घेतला जात नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
पशूसंवर्धन विभागात गट – क व ड संवर्गाच्या 729 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सध्या ठप्प झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सांगली, कोल्हापूरसह राज्यात इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरामुळे 10 ते 29 ऑगस्ट दरम्यानच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. पशूसंवर्धन परीक्षा पुढे ढकलल्याची सूचना महापरीक्षेतर्फे तीन वेळेस देण्यात आली. टप्प्याटप्प्याने परीक्षा रद्द करण्यात आली. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करीत लवकरच परीक्षेची सूचना केली जाईल, असे महापरीक्षेतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, हॉल तिकीट उमेदवारांनावाटप करूनही आता परीक्षेचे नियोजन करण्यात दिरंगाई होत असल्याने पोर्टलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
परीक्षेसंदर्भात कोणत्याही सूचना नाहीत
19 सप्टेंबर रोजी लवकरच परीक्षेचे वेळापत्रक येईल, अशी माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. मात्र, आता दोन महिने उलटूनही परीक्षेसंदर्भातील सूचना केलेल्या नाहीत. या संदर्भात उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टलकडे संपर्क साधल्यावर सूचना येईल, इतकेच सांगण्यात येत आहे. तसेच पशूसंवर्धनच्या रखडलेल्या परीक्षेसंदर्भात लवकरच कळविण्यात येईल, इतकेच सातत्याने पोर्टलवर अपलोड केले जात आहे.