मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा होताच अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची त्यांना विनंती केल्याचं पाहायला मिळालं.
तसेच, राजीनाम्यावर फेरविचार करावा असं देखील कार्यकर्त्यांनी म्हंटलं आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता अजित पवार यांनी शरद पवार यांचा निरोप कार्यकर्त्यांना सांगितला असून, दोन ते तीन दिवसात राजीनाम्याचा फेरविचार करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
नेमकं अजित पवार काय म्हणाले….
शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली. त्यानंतर शरद पवारांनी या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचं सांगितलं. दोन ते तीन दिवसात राजीनाम्याचा फेरविचार करणार असं ते म्हणाले.
पण कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं तर शरद पवार आपला निर्णय बदलणार नाहीत असंही शरद पवारांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते सिल्व्हर ओकला गेले. तिथे त्यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.