मुंबई – बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. तिथे मी 6 तारखेला जाऊन बोलणार आहे. मी तेव्हा बारसूसाठी पत्र दिले होते. मात्र, असा अत्याचार करून प्रकल्प उभारा म्हणून पत्र दिले नव्हते, असा घणाघाती हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारवर दिला. त्यांनी मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेत सरकारवर चौफेर टीका केली.
मंत्रिमंडळात मुंबई, पुणे, शेतकऱ्यांचा आवाज नाही. हे बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरचे सरकार आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. देशाच्या संविधानाचे रक्षण, हुकूमशाहीचा तीव्र विरोध आणि राज्यातील घटनाबाह्य खोके सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी ही वज्रमूठ सभा असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे बोलताना पुढे म्हणाले, पालघरमध्ये आदिवासींना घराबाहेर काढताय. परवा खारघरमध्ये श्रीसदस्यांनी तुमच्या हट्टापायी प्राण सोडले. बारसूच्या लोकांचे शाप तुम्हाला लागतील. माझे हिंदुत्व गोमूत्रधारी नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. मोहन भागवत मशिदीत जातात तेव्हा ते काय सोडतील? शिवाय मी मशिदीत गेलो, तर किती बोंबाबोंब करतील? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अदानींचे शाळेत धडे लावा
अदानींची चौकशी करू नका. त्याऐवजी शाळेत त्यांचे धडे लावा. विद्यार्थ्यांना ते श्रीमंत कसे झाले, हे समजू द्या, अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच चीन आपल्या देशाचा भूगोल बदलतो आहे, म्हणत केंद्रातल्या मोदी सरकारलाही त्यांनी लक्ष्य केले. खडसेंसारखे नेते भ्रष्टाचाराचे आरोप करून संपवले, असा आरोपही ठाकरेंनी केला.
जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडेल, त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई तोडता येत नाही, म्हणून मुंबई मारून टाकायची. तिची हत्या करायची हे यांचे मनसुबे आहेत. सगळे उद्योगधंदे बाहेर नेले जात आहेत. मुंबईतून सगळ्यात जास्त महसूल येतो. त्यामुळे तिच्या उत्पन्नाचे स्त्रोत मारून टाकले जात आहेत. मुंबईची सोन्यासारखी जमीन बुलेट ट्रेनच्या घशात घातली, असा आरोपही त्यांनी केला.
सरकारला निवडणुकांची भिती- अजित पवार
मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा नवा हिंद केसरी महाराष्ट्राला मिळाला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दीडशे बैठका घेतल्या. असे मी नाही, तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले. असे सरकार तुम्ही पाडायला लागला, तर देशात लोकशाही कशी राहणार. सत्ता येते आणि जाते. मात्र, जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी बोलताना केले. सरकारला मस्तवालपणा आलाय.
सरकार महापालिका, नगरपालिकाच्या निवडणुका का जाहीर करत नाही. निवडणुकाची भीती सरकारला कशासाठी आहे? निवडणुका जाहीर झाल्या, तर जनता काय करेल याची भीती वाटते. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपंसुक म्हटले. असे कोणत्याही सरकारला म्हटले नाही. मात्र, याचे सरकारला काहीही वाटत नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.