Chhagan Bhujbal – सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम सुरु आहे. पण, ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो हे सरकार विसरले आहे असा टोला शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
दरम्यान भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, भविष्यात दलित, आदिवासींमध्येसुद्धा कोणीही घुसतील असे करता येते का? मला दलित- आदिवासी समाजाच्या नेत्यांना विचारायचे आहे. याचे पुढे काय होणार?
सर्टिफिकेट घेऊन आदिवासी होण्याचा प्रकार सोडविताना सरकारच्या नाकी नऊ येत आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे की, मराठ्यांना फसवले जात आहे? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी काल घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात घबराट निर्माण झाली आहे. आमचे आरक्षण संपले आता पुढे काय करायचे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिक्षणासह नोकरभरतीत आपल्याला संधी मिळणार नाही, तिथे मराठे वाटेकरी असणार आहेत.
ग्रामपंचायती, पंचायत समित्यांमध्ये आमचे लोक निवडून येत होते, ते सगळे आता जाणार आहे. ओबीसी आरक्षण संपल्यासारखी स्थिती आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. ही भावना मला चुकीची वाटत नाही, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.