मुंबई – देशाच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर घोंगावणारे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे सध्या रौद्ररूप धारण करणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशाच्या अनेक राज्यांवर होताना दिसत आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील 24 तास धोकादायक होण्याची शक्यता आहे.
सध्या हे चक्रीवादळ प्रचंड वेगाने उत्तरेच्या दिशेला मार्गक्रमण करत असून, समुद्राला उधाण आल्याचं दिसून येत आहे. आणि त्यामुळेच चौपाटीवर जाणाऱ्या मुंबईकरांना खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते.
मात्र सोमवारी काही उत्साही लोक जुहू चौपाटीवर अंघोळीसाठी गेले आणि बुडाले असल्याची बातमी समोर आली आहे. या घटने मुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. मात्र, यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून चार जण अद्याप बेपत्ता आहेत.
संबंधित घटना ही जुहू कोळीवाडा येथे घडल्याची माहिती हाती लागली आहे. दरम्यान, बेपत्ता असलेल्या चार जणांचा शोध युद्ध पातळीवर सुरु असून, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Maharashtra | Today 6 people drowned in the sea at Juhu Beach. Out of 6 people, 2 were rescued by public members and 4 people are still missing. Search operation is in progress: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) June 12, 2023
दरम्यान, बिपरजॉय वादळाने कालपासून पुन्हा जोर पकडला आहे, पाकिस्तानच्या दिशेने जात असलेले हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने जात आहे. 15 जून रोजी कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीदरम्यान ‘बिपरजॉय’ या तीव्र चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या टीम्स किनारी भागात तैनात करत आहेत. तसेच सहा जिल्ह्यांमध्ये निवारा केंद्रे उभारणार आहेत.