पुणे – जिल्ह्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात केवळ 411 करोनाबाधित सापडले. तर पहिल्या टप्प्यात बाधित संख्या 3 हजार 312 सापडले होते. या आकडेवरून जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग साखळी तोडण्यात यश आले आहे. आवश्यकतेनुसार तिसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.
करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाकडून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह शिक्षक, जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी यांच्या मदतीने घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले.
15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरमधील पहिल्या टप्प्यात जवळपास 45 लाख व्यक्तींची तपासणी ेंली. त्यामध्ये 30 हजार 115 संशयितांपैकी 25 हजार 925 जणांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसल्यामुळे तपासणी केली. त्यामध्ये 3 हजार 312 बाधित सापडले.
दुसरा टप्पा 14 ते 25 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आला. त्यामध्ये 1 हजार 422 गावांमधील 45 लाख 58 हजार 373 व्यक्तींची तपासणी केली. त्यामध्ये संशयित अडीच हजार व्यक्तींची नमुने तपासणी केली असून, केवळ 411 करोनाबाधित सापडले.
पहिल्या टप्प्यात झालेल्या सर्वेक्षणामुळे संसर्गाची साखळी तुटली आणि त्याचा परिणाम दुसऱ्या टप्यात कमी झालेल्या संख्येमुळे दिसून आला. दरम्यान, तिसरा टप्पा दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.