नवी दिल्ली : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निकाल सुनावला आहे. यावर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांना प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत असून मला पाठिंबा देणाऱ्या खुला वर्गातील गुणवंतांचे मी अभिनंदन करतो, असं गुणरत्ने यांनी म्हटलं. तसेच ५२ मराठा मोर्चे, बीएमडब्ल्यूमधून जमवलेले लाखो लोक, शरद पवारांची दिल्लीतील बैठक, संजय राऊत यांची एंट्री, देवेंद्र फडणवीसांवर आणलेला दबाव, उद्धव ठाकरेंना वेठीस धरणे याविरुद्ध खुल्या वर्गातील गुणवंतांची लढाई होती, असा दावा गुणरत्ने यांनी केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने आर्टीकल १४ च्या समानतेच्या अधिकारानुसार मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस ठरवल्याचं सदावर्ते यांनी नमूद केलं.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे खुल्या वर्गातील गुणवंतांचा विजय आहे. माझ्या कुटुंबाचा जीव घेतला तरी खुल्या वर्गातील गुणवंतांसाठीची माझी लढाई सुरूच राहील. शरद पवार, सुप्रिया सुळे, विश्वास नांगरे-पाटील, मराठा संघटनांनी आमचा जीव घेतला तर महाराष्ट्र तुम्हाला जाब विचारेल, असंही गुणरत्ने यांनी म्हटलं.
मराठा समाजात कोणीही ‘फाल अँड फ्लंग’ नाही. चार-चार हजारचे पेहराव घातलेले आणि बीएमडब्ल्यू गाड्यांमध्ये मोर्चांसाठी लोक जमवले. मोर्चे कशाला म्हणतात ? समाजातून दूर राहिलेल्या वर्गाला ‘फार अँड फ्लंग’ म्हटलं जातं. मराठ्यांची अशी स्थिती नसल्याची स्पष्टोक्ती गुणरत्ने यांनी केली. देशात दडपशाही नसल्याचं त्यांनी नमूद केल्याचं म्हटलं.