कापूरहोळ, (वार्ताहर) – भोर आणि राजगड तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने तालुक्यातील तरुणाला रोजगार शोधण्यासाठी बाहेर गावी जावे लागत आहे. पुणे, मुंबई व शिरवळ या ठिकाणी रोजगार मिळाला तरी येणे-जाणे, घरभाडे यातच पगार संपून जातो. मिळालेला रोजगार कायमस्वरूपी नसतो गरज संपल्यानंतर कंपनी तरुणाला घरी बसविते आणि तरुणाला पुन्हा नोकरीच्या शोधात भटकंती करावी लागते.
नोकरीसाठी किती दिवस भटकंती चालणार ? तालुक्यातच रोजगार का मिळत नाही ? भोर तालुक्यातील रोजगार कोणी बुडवला ? पूर्वीचे उद्योग व्यवसाय का बंद पडले ? स्थानिक नेते रोजगानिर्मितीकडे का लक्ष देत नाहीत. या सारखे गंभीर प्रश्न आज डोके वर काढत आहे. आता बेरोजगार हा प्रश्न सोशल मिडियासारख्या व्यासपीठावरून चव्हाट्यावर आणत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत पुढाऱ्याची भाषणे रंगू लागली आहेत. एमआयडीसी आतापर्यंत यांच्यामुळे झाली नाही, असे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्व पक्षीय नेते आपला वरोध आणि राजकीय द्वेष बाजूला ठेवून एकत्र येतात आणि शेतकरी, कामगार, बेरोजगारी, गरिबी यावर विकासाच्या गप्पा मारतात. परंतु तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न होत नाही. जे उद्योग पूर्वी चालू होते, ते सुरू ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात नाही, या बाबत युवक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
खेडोपाडी ज्या मूलभूत सुख सुविधा पाहिजेत त्या अजूनपर्यंत पूर्णपणे पोहचल्या नाहीत याची खंत युवकांना आहे. वृत्तपत्रामध्ये आतापर्यंत अनेक वेळा बातम्याही आल्या आहेत. याकडे कोणताही नेता लक्ष देत नाही. चौकाचौकात बॅनरबाजी चालली आहे. त्याच बरोबरीला आता बेरोजगार युवक-युवतींनी व्हाटस् अॅप व फेजबुकचे ग्रुपवर आपपल्या समस्या व प्रश्न मांडत आहेत.
भोर तालुक्यातील बेरोजगारीमुळे कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या तरुणानी या विरोधात एल्गार पुकारला आहे. तरुणांनी बेरोजगारीच्या त्रासाला कंटाळत सोशल मीडियावर बेरोजगारीमुळे व्हॉट्सअँप ग्रुप केला असून हजारो तरुण तरुणी या ग्रुपवर आपल्या तीव्र भावना व्यक्त करत आहेत. तालुक्यात व्हॉट्सअँप व फेसबुक माध्यमातून मतदारापर्यंत गावो गावी पोहचून योग्य उमेदवार निवडून देण्याचे आवाहन तरुण करत आहे.
एमआयडीसीबाबत भूमिका स्पष्ट करा…
चालू निवडणूक प्रचारासाठी तालुक्याच्या बाहेरून लोक आणावी लागत आहेत. तालुक्यात सध्या तरुण निवडणुकीत भाग घेताना दिसत नाही. केवळ वयस्कर मंडळीचाच बोलबाला सुरू आहे. आता तरी भोर, राजगड तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न करा अन्यथा निवडणूक बेरोजगार तरुण हाती घेतल्याशिवाय राहणार नाही.
बदल घडविण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत बेरोजगार तरुण उमेदवार उभा राहणार, असा पणच तरुणांनी केला आहे. या मुळे आगामी लोकसभा काळात उमेदवारांनी भोर तालुक्यात एमआयडीसीसंदर्भात जाहीर सभा घेत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हानच तालुक्यातील तरुणांनी केले आहे.