नगर – गेल्या दोन-तीन वर्षात करोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून अजूनही विद्यार्थी सावरलेलेल नाही. तोच आता पालकांच्या खिशालाही 25 टक्के पुस्तकांच्या किंमती वाढल्याने कात्री लागणार आहे. यंदा कागदाच्या भाववाढीमुळे 20 ते 25 टक्के पुस्तक सेटच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
बालभारतीच्या पुस्तकांमध्ये वहीची पाने लावण्यात आल्याने त्यांच्याही किंमतीत वाढ झाली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर मे महिन्यात सुटीचे वेध लागतात. तोच नव्या शैक्षणिक सत्राची चाहूलही लागते. तर नववी, दहावी आणि सीबीएसई बोर्डाचे शैक्षणिक सत्र लवकर सुरु केले जात असल्याने खासगी शाळांकडून पालकांना त्वरीत पाठ्यपुस्तके खरेदीसाठी आग्रह धरला जातो. तर खासगी शाळा परवडत नाहीत. म्हणून पालक पोटाला चिमटा काढत शैक्षणिक साहित्य खरेदी करतात.
करोनानंतर तर काहींनी खासगी शाळांचा खर्च झेपत नाही, म्हणून मुलांना सरकारी शाळांचा मार्ग स्विकारला. परंतु यंदा खासगीच्या पाठ्युपस्तकाच्या किंमतीत यंदा वाढ झाली असून, ही वाढ 25 टक्क्यांनी वाढली आहे. तर बालभारतीच्या पहिली ते बारावीच्या सेटच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात जवळपास 80 टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कागदाच्या किंमती वाढल्या
गेल्या दोन वर्षात जो कागद 70 ते 75 रुपयांनी येत होता. त्याची किंमत आता 100 ते 150 रुपये झाली आहे. पूर्वी दहावीचा सेट सहाशे रुपयांना येत होता. आता तो सातशे ते आठशे रुपयांना झाला आहे. 20 ते 25 टक्के पुस्तकांच्या किंमतीत वाढ झाली आहे.