ठाणे – भाजपची कार्यपद्धती आणि तत्त्वज्ञान देशहिताचे नाही. त्यामुळे भाजप सत्तेवर न येणे ही काळाची गरज आहे. भेद निर्माण करणे हे राज्यघटनेस मान्य नाही. म्हणून भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले असावे, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीसंगितले.
धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण आहे. नंतर ती नसायला हवी. सध्या सुरू असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. मात्र ही राजकीय धुळवड योग्य नाही, असेही थोरात यांनी पत्रकारांना सांगितले.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष पदावरून राजकारण सुरू आहे. विधानसभेला वर्षभरापासून अध्यक्ष नाही आणि तो होऊ नये म्हणून भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. उच्च न्यायालया नंतर सुप्रीम कोर्टात जात आहेत. विधानसभेला अध्यक्ष मिळाल्याने यांचा कोणता तोटा होणार आहे? राजकारण कोणत्या थराचं करावं हे भाजपला कळत नाही, हे दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.
गोवा तो बस झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीत देवेंद्रजी म्हणत होते मी पुन्हा येईन. ते पुन्हा येईन असे निवडणुकीत म्हणायचे तेव्हा मी त्यावेळी बोललो होतो की त्यांनी आरशासमोर उभ राहावे. त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल आणि आज विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना काम पाहावं लागत आहे. भाजपचा पिंड हा खरा विरोधी पक्षासाठी बनला आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.
राजू शेट्टींशी चर्चा करण्याची तयारी
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. राजू शेट्टींची काही नाराजी असेल तर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. त्यांचे म्हणणे त्यांनी मांडले तर जे शक्य आहे ते महाविकास आघाडी नक्की करेल. किमान समान कार्यक्रमावर सर्व एकत्र काम करत आहेत. पुन्हा काही म्हणणे असेल आणि ते योग्य असेल त्यावर विचार करू. कोणाचे काही प्रश्न असले ते ऐकून घेऊ आणि सोडवू, असेही त्यांनी सांगितलं.