Mallikarjun Kharge – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अर्थात एलओसीवरील बफर झोनमुळे १९६२ च्या युध्दाचे नायक मेजर शैतान सिंह यांचे स्मारक उध्वस्त करण्यात आले आहे. त्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टीने शैतान सिंह यांचे स्मारक जमीनदोस्त करून देशाला पुन्हा एकदा आपल्या बेगडी देशभक्तीची नव्याने ओळख करून दिली आहे असे खर्गे यांनी म्हटले आहे.
भारत मातेचे वीर सुपुत्र परमवीर चक्र विजेते आणि १९६२ च्या रेजांग ला युध्दाचे महानायक शैतान सिंह यांचे लडाखच्या चुशूल येथील स्मारक उध्वस्त करण्यात आल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. पंतप्रधानांनी चीनच्या दिशेने डोळे मिटून घेतले आहेत आणि वीर सैनिकांच्या बलिदानाच्या प्रत्येक थेंबाला अपमानित केले आहे असे खर्गे यांनी काव्यपंक्तींचा आधार घेत नमूद केले.
ते पुढे म्हणाले की उपलब्ध बातम्यांनुसार हे सगळे का झाले तर चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेनंतर आता बफर झोन भारतीय हद्दीत आला आहे. गलवानमध्ये आपल्या २० जवानांनी प्राणांची आहुती दिल्यावरही पंतप्रधानांनी चीनला क्लीन चिट दिली हे खरे नाही का असा सवाल खर्गेंनी उपस्थित केला.
मेजर शैतान सिंह यांच्या नेतृत्वाखाली १३ कुमाऊंच्या सी कंपनीचे रेजांग ला च्या रक्षणासाठी ११३ जवानांनी दिलेले बलिदान ही देशाच्या दृष्टीने सर्वोच्च गौरवाची बाब आहे. त्यांचे स्मारक जमीनदोस्त करून भाजपने पुन्हा एकदा त्यांचे ते नकली देशभक्त असण्याचे प्रमाणपत्र दिले आहे. सरकार चीनपुढे गुडघे टेकत असल्याचे पाहणे अंत्यंत दु:खद आहे.
लडाख स्वायत्त पहाडी विकास परिषदेचे सदस्य खोनचोक स्टेनजीन यांनी अलिकडेच असा दावा केला होता की शैतान सिंह यांचे स्मारक आता बफर झोनमध्ये आले आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला होता. त्यावरून हे समजते की ऑक्टोबर २०२० पर्यंत हे स्मारक भारताच्या नियंत्रणात होते. त्यावेळी कुमाऊं रेजिमेंटच्या ८ व्या बटालियनने त्याचे नुतनीकरण केले होते.