नवी दिल्ली – शिवसेनेनंतर राष्ट्रवादी झालेल्या बंडाळीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अशीच काहिशी स्थिती बिहारमध्ये आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडखोरी हे विरोधकांच्या एकजुटीच्या पाटणा बैठकीचे फलित असल्याचे सुशील कुमार मोदी यांचे म्हणणे आहे. लवकरच जनता दल युनायटेडमध्येही फूट पडणार आहे. लोजपा (रामविलास) सुप्रीमो चिराग पासवान यांनी तर अनेक आमदार आणि खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी मोठा दावा करत एक-दोन दिवसांत बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल, महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल, असे सांगितले. सुशील मोदींनी राजकीय उलथापालथीच्या दाव्यामागे तर्कही दिला आहे. ते म्हणाले की, बिहारमध्येही बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. कारण नितीश कुमार यांनी गेल्या 17 वर्षांत कधीही आमदार आणि खासदारांना भेटण्यासाठी वेळ दिला नाही. लोकांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली.
आता ते प्रत्येक आमदार आणि खासदाराला 30 मिनिटे देत आहेत. नितीश कुमार यांनी पुढच्या लढाईसाठी राहुल गांधींना नेता म्हणून स्वीकारले आणि तेजस्वी यादव यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नाव दिल्यापासून जनता दल युनायटेडमध्ये बंडखोरीची परिस्थिती झाली आहे. महाराष्ट्रासारखी परिस्थिती बिहारमध्येही निर्माण होत आहे. याचा अर्थ बिहारचे विरोधी पक्षनेते भाजपच्या आमदारांसह महाआघाडीत सामील होणार आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान, जेडीयू सोडून आपला नवा पक्ष स्थापन केलेल्या उपेंद्र कुशवाह यांनीही जेडीयूमध्ये मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला आहे.
भाजपमध्येच कमालीची अस्वस्थता
जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, आज पौर्णिमा आहे. भाजपसाठी यापेक्षा चांगले दिवस कोणते असतील? ते खरे सनातनी हिंदू असतील तर आजच जेडीयू फोडून दाखवा. महाआघाडीमुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता असून ते स्वतःचे अस्तित्व वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.