मुंबई (प्रतिनिधी) – मुख्यमंत्रीपदावरून मित्रपक्ष शिवसेनेशी मतभेद आणि मनभेद झाल्यानंतर संख्याबळाअभावी भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून अखेर माघार घेतली. त्याचवेळी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला भाजपने शुभेच्छा दिल्या. भाजपच्या या भूमिकेमुळे सत्तासंघर्षाला नाट्यमय वळण लागले असून महाराष्ट्राचे भवितव्य आता शिवसेनेच्या हाती आहे.
त्यामुळे शिवसेना सरकार स्थापन करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला असून शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपने सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट करताच राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे.
राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या निमंत्रणावर चर्चा करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. ही बैठक दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. परंतु त्यात निर्णय झाला नाही. त्यानंतर बैठकीचे दुसरे सत्र संध्याकाळी 4 वाजता सुरू झाले.
ही बैठक साधारण दोन तास झाली. या बैठकीत केंद्रिय नेतृत्वाचा निरोप घेऊन भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादवही उपस्थित राहिले होते. यावेळी भाजप नेत्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याचेही कळते. या बैठकीला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे उपस्थित होते.
या बैठकीनंतर “वर्षा’ निवासस्थानाहून भाजपच्या नेत्यांच्या वाहनांचा ताफा थेट राज्यपालांच्या निवासस्थानाकडे रवाना झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन भाजपच्या नेत्यांनी आम्ही सरकार स्थापन करू शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर राजभवनाबाहेरच चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे निवेदन केले.
राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व इतर मित्र पक्षांची महायुती झाली होती. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो. जनादेश महायुतीला मिळाला. जनतेने महायुतीला भरघोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी शनिवारी आम्हाला नव्याने सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते.
पण, शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी बरोबर येऊ इच्छित नाही. त्यामुळे आता आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. जनादेशाचा अनादर करून शिवसेनेला कॉंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत निवेदन करून भाजपचे हे नेते अवघ्या दोन मिनिटांत राजभवनातून बाहेर पडले.