आयटी कंपन्यांतील डिजिटल काम वाढणार
पुणे – गेल्या आठवड्यात इन्फोसिस आणि कॉग्निझंट या कंपन्यांनी कर्मचारी कपात जाहीर केल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. मात्र, या कंपन्याचे डिजिटल क्षेत्रातील काम वाढणार आहे. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर आधारित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करावे लागणार असल्याचे तज्ञांनी सांगितले.
विशेषतः मध्यम गटातील पाच ते दहा टक्के कर्मचाऱ्यांना या कंपन्यांना कमी करावी लागेल, असे इन्फोसिसचे माजी मुख्य वित्त अधिकारी के. गोपालकृष्णन यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांमुळे या कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम होत आहे. स्पर्धेमुळे या कंपन्या अतिरिक्त भार सहन करू शकणार नाहीत. कॉग्निझंट आणि इन्फोसिस या कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर इतर कंपन्या कर्मचारी कपात करतील का, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, “असा निर्णय घेण्याबाबत बऱ्याच काळापासून दबाव आहे.’
कंपन्यांवर मंदीचा फार परिणाम नाही
जागतिक व्यासपीठावर मंदीने धुमाकूळ घातला असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यावरही होऊन या कंपन्यांनाही मंदीचा परिणाम होईल, असे गृहीत धरले जात होते. मात्र आतापर्यंत तरी कंपन्यांच्या उलाढाल किंवा कामावर कसलाही परिणाम झालेला नाही. कारण, या कंपन्या नव्या परिस्थितीत स्वतःला बदलतात. त्याचाच भाग म्हणून या कंपन्यांना नवे तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून जुन्या तंत्रज्ञानावर आधारित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करावे लागणार आहेत. भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी यापूर्वीही जुने तंत्रज्ञान सोडून नवे तंत्रज्ञान स्वीकारले आहे, असे गोपालकृष्णन म्हणाले.