सातारा -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या राज्य कारभाराविषयी सर्वसामान्यांबरोबरच जागतिक पातळीवर आकर्षण आहे. देशाचे नेतृत्व करण्यासाठी हवा असणारा धोरणाचा खमकेपणा मोदी यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 2024 झाली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप तब्बल 400 हून अधिक जागा मिळवेल, असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवलच्या उदघाटनानिमित्त ते आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
कोल्हापूर पोटनिवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकू, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “”मोदी यांच्या कामाच्या पद्धतीमुळे केंद्र स्तरावरून सर्वसामान्यांसाठी विकास योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती आणि जीडीपीमध्ये वाढ होत आहे. देशात एक लाख 434 कोटीचे बजेट केवळ केंद्र स्तरावरील रस्त्यांसाठी आखण्यात आले आहे. मोदी शासनाने साठ टक्के निधी देशासाठी आणि 40 टक्के निधी राज्यांसाठी असा वाटप केला आहे. 45 कोटी जनधन खाती उघडण्यात आली असून 32 कोटी लोकांना मुद्रा कर्ज मिळाले आहे. त्यामुळे विकासकामांचा झपाटा जोरदार असून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला काळजी करण्याचे कारण नाही.’
भाजप आणि मनसेच्या राजकीय जवळकीबाबत ते म्हणाले, “मनसेला सोबत घेणे योग्य वाटत नाही. मनसेचे सध्या वादळ असले तरी त्यांना फारशी मते मिळतात असे नाही. आता हिंदुत्ववादाचा मुद्दा घेतला असला तरी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचा वादळ हे भाषणांचा आहे, मतांचं नाही.’ निवडणुकीनंतर इंधन दरवाढ निश्चित कमी होईल. मात्र, राज्याने काही टक्के दरवाढ कमी करावी, केंद्राला दोषी धरू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याबाबत ते म्हणाले, “सक्षम नेता म्हणून पवार यांची महाराष्ट्रात प्रतिमा आहे. तरीसुद्धा त्यांच्या घरावर हल्ले होत असेल तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत.’ एसटी कर्मचारी आणि त्यांचे पगार तसेच महामंडळाचे विलीनीकरण हे मुद्दे राज्य शासनाने तात्काळ निकाली काढून कर्मचाऱ्यांची सोय करावी, असे मत त्यांनी मांडले.