अख्ख्या देशातील राजकीय पक्षांना आपल्या भुवयांच्या इशाऱ्यावर नाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाला बिहारमध्ये जबरदस्त फटका बसला आहे. बिहार मिशन फेल झाल्यानंतर झारखंड, राजस्थान आणि छत्तीसगडच्या प्रस्तावित मोहिमेला कदाचित लांबणीवर ढकलले जाईल!
बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती पुन्हा एकदा तुटली आहे. 26 वर्षांच्या इतिहासात नितीशकुमार यांनी भाजपला दुसऱ्यांदा झटका दिला आहे. नितीशकुमार यांची समता पार्टी होती तेव्हापासूनच भाजपसोबत आले होते. 2000 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते भाजपसोबत होते. तेव्हापासून आतापर्यंत नितीशकुमार यांच्या आठपैकी पाच वेळच्या शपथविधी सोहळ्यात भाजप हा त्यांचा मित्रपक्ष होता. परंतु, आता नितीशकुमार यांनी भाजपला पुन्हा एकदा झटका दिला आहे.
बिहारमध्ये अचानक आलेल्या राजकीय भूकंपामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आपल्यासोबत असे काही तरी होईल याची कल्पनासुद्धा केंद्रातील सत्ताधारी पक्षाने केली नसेल. परंतु, जेडीयूने हा झटका दिला हे खरे आहे. भाजपची मंडळी आता बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. नितीशकुमार कधी ना कधी भाजपला सोडून जातील आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करतील याचा आभास आम्हाला आधीपासूनच होता, असे सांगून भाजप आपली झाकली मूठ सव्वालाखाची ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच आम्ही नितीशकुमार यांना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही, असे सांगून भाजपचे नेते स्वत:च्या मनाला समजाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, नितीशकुमार यांच्या एकाच राजकीय डावात भाजप सत्तेच्या मैदानातून बाहेर झाला आहे, हे सत्य नाकारता येत नाही. नितीशकुमार यांनी बिहारच्या राजकारणात भाजपला पाच वर्षांपूर्वीच्या वातावरणात नेऊन उभे केले आहे. याची भाजपने कधी कल्पनाही केली नसेल. एक मात्र स्पष्ट झाले की, बिहारमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो, सत्तेची किल्ली नेहमी नितीशकुमार यांच्याकडेच राहणार.
बिहार विधानसभेची मागची निवडणूक भाजप-जेडीयूने नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढविली होती. दोन्ही पक्षांना अगदी काठावर बहुमत मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, यात भाजपची ताकद चांगली वाढली होती, तर जेडीयूला जबरदस्त फटका बसला होता. भाजपचे आमदार 53 वरून 74 झाले. त्याचवेळी जेडीयूचे आमदार 71 वरून 43 वर आले होते. बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र, त्यांच्या सोबतीला दोन उपमुख्यमंत्रीसुद्धा बनविले. याशिवाय विधानसभा अध्यक्षपदासह मंत्रिमंडळातही भाजपने मोठा वाटा घेतला होता. आपल्या मनाप्रमाणे काम करणारे नितीशकुमार यांना त्यावेळी अगदी बेमनाने भाजपच्या अटी मान्य कराव्या लागल्या होत्या; परंतु भाजपच्या व्यवहाराने ते दुखावले होते.
विधानसभेच्या या निवडणुकीत नितीशकुमार यांचे आमदार घटण्यामागे खरा हात होता तो लोकजन शक्ती पक्षाचा. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी भाजपच्या उमेदवाराविरूद्ध एकही उमेदवार उतरविला नव्हता. याउलट जेडीयूच्या विरोधात ताकदवर उमेदवार दिले होते. यामुळे नितीशकुमार यांना मतदानाचा फटका बसला आणि त्यांचे अनेक उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. लोजपा रालोआचा घटक पक्ष असूनही चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात निवडणूक लढविली. यामागे भाजपचा हात आहे, अशी शंका नितीशकुमार यांना होती. नितीशकुमार यांनी अनेक वेळा आपले म्हणणे जगजाहीरपणे मांडले. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी म्हटले असते तर चिराग पासवान निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले असते; परंतु भाजपचे नेते तर जेडीयूला कमजोर करण्यासाठीच पासवान यांना रसद पुरवित होते, असे ते अनेकवेळा म्हणाले.
चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने 134 विधानसभेच्या जागा लढवल्या होत्या. परंतु, बेगुसराय जिल्ह्यातील मटिहानी मतदारसंघातून जेडीयूच्या उमेदवाराचा फक्त 303 मतांनी पराभव करून लोजपाने ही जागा जिंकली होती. लोजपाला 23 लाख 82 हजार 739 म्हणजेच 5.59 टक्के मते मिळाली. त्याचा थेट फटका जेडीयूला बसला. भाजपने या निवडणुकीत 110 जागा लढवून 82 लाख 2 हजार 67 मते म्हणजे 19.46 टक्के मते मिळवली होती. दुसरीकडे, नितीशकुमार यांच्या जेडीयूला 115 जागा लढवून केवळ 64 लाख 50 हजार 179 म्हणजेच 15.39 टक्के मते मिळवता आली. दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दलाने 144 जागा लढवून 75 जागांसह 97 लाख 38 हजार 855 मते म्हणजेच 23.11 टक्के मते मिळवली. आरजेडीसोबतच्या महाआघाडीचा भाग असलेल्या कॉंग्रेसला 70 जागा लढवून केवळ 19 जागा जिंकता आल्या. कॉंग्रेसला 39 लाख 95 हजार 319 म्हणजेच 9.48 टक्के मते मिळाली.
नितीशकुमार यांच्या मनात आधीपासून एका शंकेने जन्म घेतला होता आणि तो असा की, भारतीय जनता पक्षाचा जेडीयूच्या मतदारांवर डोळा आहे आणि जेडीयूला कमजोर करण्यासाठी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत आहे. नितीशकुमार यांनी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र प्रसाद सिंह यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री बनविले होते. मात्र, त्यांचा व्यवहार अशाप्रकारचा होता जणू ते जेडीयूचे नव्हे तर भाजपचे खासदार आहेत. अनेकदा त्यांनी नितीशकुमार यांच्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. ही गोष्ट नितीशकुमारांना खटकली. त्यामुळे नितीशकुमार यांनी रामचंद्र प्रसाद सिंह यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवले नाही. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला. हळूहळू रामचंद्र प्रसाद सिंह यांना पक्षात कमकुवत करत नितीशकुमार यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या माध्यमातून भाजप आपल्या पक्षाच्या आमदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. भाजप नेते बिहार सरकारच्या कामकाजातही गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करू लागले होते. त्यामुळे सरकार चालवणे कठीण झाले. कदाचित म्हणूनच, नितीशकुमार यांनी भाजपसोबत युती तोडून राजदसोबत सरकार स्थापन करणे योग्य समजले.
नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झालेत आणि आधीपेक्षा कितीतरी जास्त आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशसह अनेक ठिकाणी आमदारांच्या पक्षांतरानंतर सरकार स्थापन करणाऱ्या भाजपला नितीशकुमार यांनी आरसा दाखवला आहे. भाजपला झटका दिल्यामुळे देशाच्या राजकारणातही नितीशकुमार मोठी भूमिका बजावू शकतात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे उभा करता येईल, असा एकही नेता विरोधी पक्षाकडे नव्हता, आता तो मिळाला आहे. नितीशकुमार यांच्या नावावर सर्व पक्ष एकत्र येऊ शकतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
सुशासन बाबू या नावाने प्रसिद्ध असलेल्या नितीशकुमार यांची प्रतिमा सर्वसाधारणपणे स्वच्छ मानली जाते. भाजपसोबतची युती तोडण्यापूर्वी नितीशकुमार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही अनेकवेळा फोनवरून चर्चा केली आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधींनीही नितीशकुमार यांच्या नावावर सहमती दर्शवली, तर पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपला नितीशकुमार यांच्याकडून चुरशीची लढत मिळू शकते.
नितीशकुमारांच्या धक्क्यानंतर झारखंडसह अनेक राज्यांमध्ये भाजपकडून चालवले जाणारे ऑपरेशन लोटसही थांबविले जाऊ शकते. राजकारणाच्या मैदानात आतापर्यंत खुलेपणाने खेळणाऱ्या भाजपला आगामी काळात कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सहभागी असलेल्या इतर पक्षांना आता भाजपला डोळे दाखवण्याची संधी मिळणार असून त्यांना पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळू शकतील.