“वन्यप्राण्यांचा मानवावर हल्ला’ हा विषय तसा आता नवीन राहिलेला नाही. आपल्याच चुकांमुळे हे घडते, हे आपल्याला पटतही नाही. तसेच वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यातही आपण अपयशी ठरलो आहोत.
माणूस जितका सुसंस्कृत होत गेला, तितकाच तो स्वार्थी बनला. मित्र आणि सोबती असणाऱ्या वन्यजीवांशी तो अत्यंत क्रूरपणे वागू लागला. ज्या नैसर्गिक वातावरणात तो राहतो, तेथील प्राणी, पक्षी, जंगली जीव हे आपले मित्र आहेत, ते आपल्या सभ्यतेशी आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत याची त्याने जराही पर्वा केली नाही. विकासाच्या नावाखाली जंगले तोडायला सुरुवात झाली. परिणामी जंगलांचा अंत होण्यास सुरुवात झाली. वन्य प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष सुरू झाला. यामध्ये दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याऐवजी आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश हाच मानवी जीवनाचा उद्देश बनवला. त्याचे परिणाम आपण आज भोगत आहोत. त्यामुळे सिंह, वाघ, बिबटे, हत्ती असे वन्यजीव मानवी वस्तीपर्यंत पोहोचत आहेत.
मानवी वस्तीतील वन्यजीवांचा शिरकाव हा प्रसारमाध्यमांमध्ये रोज चर्चेत असतो. संतप्त गजराज जंगलाच्या आजूबाजूच्या मानवी वस्तीत जाऊन गोंधळ माजवत असतात. ते शेतातील पिके तुडवतात आणि वस्त्यांसह झाडांचे नुकसान करीत आहेत. रागाने ते माणसांना पायदळी तुडवतात. पण गजराजाच्या या नाराजीचे कारण शोधण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही. वन आणि पर्यावरण मंत्रालयाने केलेले कायदे पांढरे हत्ती ठरले आहेत. प्रतिबंधित असतानाही वन्यजीवांची रानटीपणे शिकार केली जात आहे. नैसर्गिक संरचनांशी छेडछाड करण्याचा फटका मानवालाच बसत आहे. वन्यजीवांविषयी मानवाची क्रूरता थांबता थांबत नाही. 2020 मध्ये केरळमधील घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले होते. तेथे गन पावडरने भरलेले अननस खाल्ल्याने एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. ही घटना सोशल मीडियावर गाजली. नंतर केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले होते.
जंगले नष्ट झाल्यानंतर तेथे राहणारे वन्यजीव कुठे जाणार? अन्नाच्या शोधात ते मानवी वस्तीपर्यंत पोहोचून नुकसान करतात. एका अहवालानुसार 2022 मध्ये 70 पेक्षा जास्त लोक हत्तींच्या नाराजीचे बळी ठरले आहेत. 16 राज्यांमध्ये हत्तींच्या हल्ल्यांत झपाट्याने वाढ झाली आहे. 2020-21 या वर्षात देशभरात हत्तींमुळे 461 लोकांचा मृत्यू झाला. 2021-22 मध्ये ही संख्या 532 वर पोहोचली तर 2019 मध्ये 585 लोकांचा मृत्यू झाला. हत्ती मुख्यत्वे झारखंड, ओरिसा आणि पश्चिम बंगालमधील लोकांवर हल्ले करतात. त्यापाठोपाठ छत्तीसगड आणि तमिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.
जेव्हा केंद्राकडून राज्य सरकारांना असे अहवाल प्राप्त होतात, तेव्हा बाधित परिसरात हत्तींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. पैसे आणि लोकांच्या नुकसानीबद्दल आर्थिक मदतही दिली जाते. एका वृत्तानुसार झारखंडमध्ये हत्तींच्या हल्ल्यात आतापर्यंत 133 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे अरुणाचलमध्ये एक, आसाममध्ये 63, छत्तीसगडमध्ये 64, कर्नाटकात 17, केरळमध्ये 25, मेघालयात दोन, ओरिसात 112, तमिळनाडूत 37, त्रिपुरात दोन आणि पश्चिम बंगालमध्ये 77 जणांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. केरळमध्ये हत्तींचा हल्ला टाळण्यासाठी बलयमचल आणि तालिपरंबा पर्वतरांगांमध्ये 10 ते 28 किलोमीटरपर्यंत लांबीच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे संरक्षित क्षेत्रातून हत्ती बाहेर पडू शकत नाहीत.
धार्मिक श्रद्धांनुसार गजराज म्हणजे हत्ती हे गजाननाचे रूप आहे. पारंपरिक उत्सव आणि विवाहांमध्ये प्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण मंगलमूर्ती गणपती हे आद्य पूज्य देव मानण्यात आले आहेत. मात्र माणसाच्या बदललेल्या स्वभावामुळे मंगलमूर्ती गजराज मात्र संतप्त झाले आहेत. 2017 मध्ये देशभरात हत्तींची गणना करण्यात आली होती. त्यापूर्वी 2012 साली हत्तींची गणना झाली होती. त्यावेळी हत्तींची संख्या 30 हजार असल्याचे सांगण्यात आले होते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हत्तींच्या आशियाई प्रजातींपैकी 60 टक्के प्रजाती भारतात आढळतात. परंतु हत्तींच्या संख्येत मात्र 10 टक्के पेक्षा अधिक घट झाली आहे. एका अहवालानुसार 2014 ते 2019 दरम्यान 500 पेक्षा अधिक हत्तींचा अकाली मृत्यू झाला.
मानव आणि वन्यजीव संघर्ष हे हत्तींच्या मृत्यूचे मुख्य कारण आहे. याखेरीज रेल्वे रूळांवर होणारे मृत्यू, शिकार करणे, विजेचा धक्का लागून अशा विविध कारणांनी हत्तींचे मृत्यू होतात. 2010 मध्ये हत्तीला “राष्ट्रीय वारसा प्राणी’ घोषित करण्यात आले. आता काळाच्या ओघात आपली विचारसरणी बदलून आपण वन्य प्राण्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. जंगलांभोवती असलेल्या मानवी वस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी विस्तृत व्यवस्था करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. असे केल्यास वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष टळू शकतो. याप्रश्नी वेळीच लक्ष न दिल्यास हत्ती हाही आगामी काळात नामशेष होणारा प्राणी ठरू शकेल.