मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य हा राज्याचा आणि छत्रपती शिवरायांचा अपमान असून भारतीय जनता पक्षाने राज्यपालांचा निषेध केला पाहिजे अशी सूचना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख जुन्या काळातील आदर्श असा केला होता. त्या संबंधात आज पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले . ते म्हणाले की, सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात भाजपने निदर्शने केली होती. आता त्यांनी राज्यपालांच्या विरोधात राजभवनवर जाऊन निदर्शने केली पाहिजेत. राहुल गांधींच्या प्रतिमेला भाजपच्या लोकांनी जोडे मारले होते आता तेच जोडे घेऊन त्यांनी राजभवनावर जायला हवे असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, त्याच आता चपला राजभवनात जायला हव्यात जिथून शिवाजी महाराजांवर टीका केली जात आहे. मगच तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात, नाहीतर खोटे आहात, असे राऊत भाजपला उद्देशून म्हणाले.
युवकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे – राज्यपाल कोश्यारी
शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनीही राज्यपालांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. आम्हाला त्यांच्या पासूनच सतत प्रेरणा मिळते. ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावरून प्रभू राम आणि भगवान श्रीकृष्ण हेही आता जुन्या काळातील आदर्श झाले आहेत असे समजायचे काय? असा सवाल त्यांनी केला. पूजा करण्यासाठी आता नवीन देवता शोधायला हव्यात का?असा सवालही त्यांनी केला.