नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अधिररंजन चौधरी यांनी बुधवारी नम्रतापूर्वक राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठीच्या निमंत्रणाचा अस्वीकार केला. तसेच, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील मंदिराला राजकीय प्रकल्प बनवल्याचा आरोपही केला.
कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी निवेदनाद्वारे दिली. भगवान रामाची पूजा-अर्चा कोट्यवधी भारतीय करतात. धर्म हा मानवाचा व्यक्तिगत विषय आहे. मात्र, निवडणुकीत लाभ उठवण्याच्या उद्देशातून अर्धनिर्मित मंदिराचे उद्घाटन केले जात आहे, असा आरोपही त्या निवेदनातून करण्यात आला आहे.
राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीला होणार आहे. त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप, संघ आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांनी देशव्यापी संपर्क अभियान हाती घेतले आहे. साधू-संतांसह राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
निमंत्रितांमध्ये भाजप आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांचाही समावेश आहे. संबंधित सोहळ्याला भाजपने राजकीय स्वरूप दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.