पंढरपूर: भाजपने राज्यातील राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, काही नेते बॅंक व कारखान्याच्या कर्जाला घाबरून, तर काहींना आमिषे दाखवली जात आहेत. त्यामुळे पक्षांतरचे प्रमाण वाढत आहे. सत्तेचा आश्रय हवा म्हणून ते लोक जात आहेत. राज्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद जास्त आहे म्हणूनच राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र नागरिक लोकसभेत जे केले ते विधानसभेत करतील असे वाटत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विधानसभेत व विधानपरिषदेत प्रभावी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही ताकद दाखवून दिली आहे. शिवसेनेमुळे भाजपला धोका नाही तर शिवसेनेच्या मुळावरच भाजप येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.